क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात अनेक बदल करण्यात आले आहेत. क्रिकेटमधील प्रत्येक निर्णय अचूक असावा यासाठी काळजी घेतली गेली आहे. गेल्या काही वर्षात लेग साईडला जाणारा चेंडू हा वाइड दिला जात होता. त्यामुळे गोलंदाजांना चेंडू टाकण्यासाठी खूपच काळजी घ्यावी लागत होती. आता त्यासाठी नियम आखून देण्यात आला आहे. वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूसाठी एक लाईन ठरवून दिली होती. त्यानुसार पंच निर्णय घेत होते. अगदी तसाच नियम आता लेग साइडला जाणाऱ्या चेंडूसाठी असणार आहे. आता अशीच एक लाइन लेग साईडला असणार आहे. चेंडू या लाइनच्या आत असेल तर वाइड दिला जाणार नाही. यापूर्वी लेग साइडला जाणारा प्रत्येक चेंडू हा वाइड दिला जात होता. पण आता या नियमात बदल केला आहे. त्यामुळे गोलंदाजांना रणनिती आखण्यास आणखी मदत मिळणार आहे. भारत ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेपासून हा नियम लागू होणार आहे.
आयसीसीच्या नियमाचा गोलंदाजांना फायदा होणार आहे. कारण फलंदाज क्रिजवर मूव्ह केल्यानंतर गोलंदाज त्यांना चकवा देत चेंडू लेग साइड बाहेर टाकत होते. पण हा चेंडू वाइड दिल्याने गोलंदाजांचा हिरमोड व्हायचा. आता गोलंदाजांना त्यातल्या त्यात दिलासा मिळणार आहे. ऑफ स्टंपला जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्नात असलेल्या फलंदाजांना काळजी घ्यावी लागणार आहे. कारण गोलंदाज आता नव्या नियमाचा वापर करत फलंदाजांना फसवू शकतात.
दुसरीकडे, भारत ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत तुम्ही पाहीलं असेल की फलंदाजांना धावा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण दोन चेंडूंच्या नियमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे फलंदाजांना बेधडक धावा करण्यात अडचण येत आहे. वनडे क्रिकेटमध्ये 34 षटकांपर्यंत दोन नवे चेंडू वापरल जात आहेत. पण त्यानंतर 16 षटकांपर्यंत एकच चेंडू असेल. त्यामुळे गोलंदाजांना फायदा मिळणार आहे. कारण रिव्हर्स स्विंगमुळे फलंदाजी करण्यास अडचणींचा सामना करावा लागेल.
सीमेरेषेजवळ झेल पकडण्याचा नियमातही बदल करण्यात आला आहे. जर खेळाडू सीमेपार जात झेल घेत असेल तर त्याला चेंडूसोबत एकदाच उडी मारता येणार आहे. अन्यथा हा झेल अवैध मानला जाईल.