Waluj MIDC Roads: वाळूज एमआयडीसीतील रस्ते गेले खड्ड्यांत; उद्योजक त्रस्त, एक वर्षात उखडला रस्ता
esakal November 03, 2025 02:45 PM

बजाजनगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ई-सेक्टरमधील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, त्यामुळे येथील उद्योजक त्रस्त झाले आहेत. एमआयडीसीने अवघ्या वर्षभरापूर्वी सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केला होता. परंतु, आता या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनविण्यात आला, असा आरोप उद्योजकांनी केला आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे उद्योगपती त्रस्त

ई-सेक्टरकडे जाणारा मुख्य रस्ता ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीजवळील वजनकाटा भूखंडापासून ई-सेक्टरमधील गट क्रमांक ४३ पर्यंतचा हा मार्ग दररोज मालवाहतुकीसाठी वापरला जातो. भूखंड क्रमांक १०० ते १०९ दरम्यानच्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

परिणामी, ई-सेक्टरमधील सुमारे ५० ते ६० तसेच गट क्रमांक ४३ मधील जवळपास १५९ लघुउद्योजक त्रस्त झाले आहेत. याबाबत उद्योजक सर्जेराव साळुंके, विनायक राऊत, बालाजी निकम, शफिकोद्दीन इनामदार, मंगेश आंधळे, विजय जाधव, संदीप बोगे, प्रभाकर महालकर आदींनी एमआयडीसी प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.

संताप आणि उद्वेग

एमआयडीसीने रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत आणि मजबूत, टिकाऊ रस्ता तयार करावा. त्रस्त उद्योजकांना दिलासा मिळावा, ही आमची मागणी आहे.

- संदीप जाधव, लघुउद्योजक

खराब रस्त्यामुळे आमच्या कंपनीत मोठ्या उद्योगांचे अधिकारी यायचे टाळतात. त्यामुळे नवीन वर्क ऑर्डर मिळत नाही. फिनिश मटेरियल खराब होऊन नुकसान होते. उद्योगांच्या वाढीसमोर रस्त्याचा अडसर निर्माण झाला आहे.

- श्रीहरी राऊत, लघुउद्योजक

Pimpri Chinchwad News : लघु उद्योजकांच्या समस्या ‘अवजड’,एमआयडीसी, महापालिकेचे सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष

मागील वर्षी मसिआच्या माध्यमातून आम्ही एमआयडीसीकडे हा रस्ता तयार करण्याची मागणी केली होती. अखेर २०२४ च्या शेवटी रस्ता तयार झाला. पण फक्त एका वर्षातच रस्त्यावर खड्डे पडले. इतक्या लवकर सिमेंट काँक्रीटचा रस्ता खराब कसा झाला, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे.

-मनोज शिरसाट, लघुउद्योजक

स्थानिक एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली तरी दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आता आम्ही मुंबई येथील मुख्य कार्यालयात तक्रार दाखल करणार आहोत.

- अशोक गाजरे, लघुउद्योजक

रस्ते, पाणी आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा या समस्यांमुळे कामगार या परिसरात काम करण्यास नकार देतात. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो.

-राजेंद्र रोडगे, लघुउद्योजक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.