Rahul Gandhi News : राहुल गांधींच्या 'मतचोरी'च्या मोहिमेला मोठा धक्का? एका सर्व्हेने अडकले चक्रव्युहात...
Sarkarnama January 03, 2026 03:45 AM

मागील काही महिन्यांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून निवडणुकांमधील कथित घोळावरून भारत निवडणूक आयोग व भाजपवर टीकास्त्र सोडत आहेत. पत्रकार परिषदांमधून त्यांनी मतदान प्रक्रिया कशाप्रकारे हँक करण्यात आली, याबाबत अनेक आरोप केले. संसदेतही हा मुद्दा गाजला. त्यानंतर आता एका सर्व्हेने राहुल यांच्यासह काँग्रेस व विरोधी पक्ष चक्रव्युहात अडकले आहे.

काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकातील सिध्दरामय्या सरकारने एक सर्व्हे प्रसिध्द केला आहे. या सर्व्हेतील आकडेवारीने काँग्रेसचीच कोंडी झाली आहे. अहवालानुसार, ८३ टक्के लोकांना ईव्हीएमवर विश्वास असल्याचे म्हटले आहे. ‘लोकसभा इलेक्शन २०२४ – इव्हॅल्यूएशन ऑफ इंडलाईन सर्व्हे ऑफ नॉलेज, एटिट्यूड अंड प्रॅक्टिस ऑफ सिटिझन्स’ असे या सर्व्हेचे नाव आहे.

सर्व्हे अंतर्गत कर्नाटकातील बेंगलुरू, बेळगावी, कलबुर्गी आणि म्हैसूर या भागातील १०२ विधानसभा मतदारसंघातील लोकांची मते जाणून घेण्यात आली. त्यामध्ये ५ हजार १०० मतदारांनी सहभाग घेतला. राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. अंबुकुमार यांच्या माध्यमातून सरकारने हा सर्व्हे केला होता.

Mahapalika Election : सावधान! रोख रक्कम घेऊन जात असाल तर 'ही' काळजी घ्या, निवडणूक आयोग गय करणार नाही, काढला आदेश

भारतातील निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पडत असल्याचे मत ८४.५५ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. २०२३ मधील सर्व्हेच्या तुलनेत २०२४ च्या सर्व्हेमध्ये ईव्हीएमवर विश्वास असलेल्या लोकांचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. २०२३ मध्ये ७७.९ टक्के तर २०२४ मध्ये ८३.६१ टक्के लोकांनी ईव्हीएमवर पूर्ण विश्वास असल्याचे मत नोंदविले आहे.

सर्व्हेत सहभागी असलेल्या ९५.७५ टक्के लोकांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते. ज्या ४ हजार २७२ लोकांचे नाव मतदारयादीत होते. त्यांच्यापैकी ९५.४४ टक्के लोकांनी मतदारयादीबाबत समाधान व्यक्त केले आहे. तर १६.३ टक्के लोकांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपले मतदान प्रभावित करण्याचा प्रयत्न झाल्याचीही कबुली दिली आहे.

Nagpur Municipal Election : हायव्होल्टेज ड्रामा; भाजपच्या ‘त्या’ उमेदवाराला कार्यकर्त्यांनीच डांबलं घरात, नेत्यांची धावपळ

सरकारी योजनांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रमाण सर्वाधिक ४२.२६ टक्के होते. तर नोकरी देण्याचे आश्वासन दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सर्व्हेत सहभागी लोकांनी सांगितले. निवडणुकांमध्ये पैशांचा वापर मोठ्य प्रमाणात वाढत असल्याचे जवळपास ५० टक्के लोकांनी मान्य म्हटले आहे. दरम्यान, या सर्व्हेने काँग्रेसचे कोंडी झाली आहे.

विरोधकांनीही आता काँग्रेसला घेरण्यास सुरूवात केली आहे. मुंबई शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी म्हणाल्या, ‘निवडणूक प्रक्रियेच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सर्व आरोपांना हा सर्व्हे एक उत्तर आहे.’ कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनीही राहुल यांच्यावर टीका केली. राहुल गांधी अनेक वर्षे देशभरात फिरत देशातील लोकशाही धोक्यात असल्याचे सांगत आहेत. ईव्हीएमवर विश्वास नसल्याचे सांगतात. पण कर्नाटकातील सर्व्हेने काँग्रेस आणि राहुल गांधी यांना तोंडावर पाडले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.