टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2026 मधील पहिल्या आणि एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात केली. भारताने बडोद्यात 11 जानेवारीला न्यूझीलंड विरुद्ध 301 धावांचा यशस्वी पाठलाग करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र त्यानंतर शुबमनसेनेने सलग दुसरा विजय मिळवून मालिका नावावर करण्याची संधी गमावली. न्यूझीलंडने जोरदार कमबॅक करत दुसरा सामना जिंकला. न्यूझीलंडने राजकोटमध्ये एकदिवसीय सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना विजय मिळवणारी पहिली टीम ठरली. न्यूझीलंडने यासह मालिकेत बरोबरी साधली.
आता दोन्ही संघांकडे उभयसंघातील तिसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची बरोबरीची संधी आहे. त्यामुळे दोन्ही संघांत जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. न्यूझीलंडला भारतात कसोटीनंतर एकदिवसीय मालिकेत पराभूत करुन 2026 वर्षाची दणक्यात सुरुवात करण्याची संधी आहे. तर यजमान या नात्याने कर्णधार शुबमनसमोर मालिका राखण्याचं आव्हान आहे. त्यामुळे शुबमनच्या नेतृत्वाचा या तिसऱ्या सामन्यात कस लागणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेट टीम 2024 साली भारत दौऱ्यावर आली होती. न्यूझीलंडने तेव्हा यजमान भारताचा 3 सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने धुव्वा उडवला होता. भारतावर सडकून टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता या एकदिवसीय मालिकेत भारतावर मालिका पराभवाची टांगती तलवारही आहे. तसेच भारताला विजयाची संधीही आहे. अशात आता तिसऱ्या सामन्यात काय होतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
न्यूझीलंडच्या संघात भारत दौऱ्यासाठी प्रमुख खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच न्यूझीलंडला भारतात आतापर्यंत एकदाही एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे न्यूझीलंडकडे कसोटीनंतर वनडेत भारताचा सुपडा साफ करुन इतिहास घडवण्याची दुहेरी संधी आहे. तर भारताला कसोटीनंतर वनडेत मालिका गमवायची नसेल तर काहीही करुन सामना जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे कर्णधार शुबमनसोबतच भारतीय संघाचा तिसऱ्या सामन्यात कस लागणार आहे.
दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना हा रविवारी 18 जानेवारीला होणार आहे. हा सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.