राज्यातील 29 महापालिकांचा निकाल जाहीर झाला असून बहुतांश जागांवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व दिसत आहे. तर 20 वर्षांनी एकत्र येत युती केलेल्या ठाकरे बंधूंचा करिश्मा फारसा चाललेला नसून ठाकरेंना बीएमसी देखील गमावावी लागली आहे. राज ठाकरे यांच्या मनसेची स्थिती तर राज्यात खूपच वाईटच असून बीएमसी निवडणुकीत त्यांचे दहापेक्षाही कमी उमेदवार निवडून आलेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अव्घे 6 उमेदवार विजयी झाले असून इतर महापालिकांमध्येही राज ठाकरेंचा पक्षा फारसा करिश्मा दाखवू शकलेला नाही.
याच निकालाच्या, पराभवाच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पोस्ट लिहीत काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच असं म्हटलं होतं. त्यांच्या या पोस्टची खूप चर्चा होत आहेच.
माच्र त्यानंतर आणखी काही वेळाने राज यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहीली आहे. माझं आणि तुमचं नातं फक्त एका ‘बटनापुरतं’ किंवा ‘मतापुरतं’ कधीच नव्हतं. मराठी माणसासाठी आमचा लढा सुरुच राहील ! असं म्हणत अमित ठाकरेंनी, ‘ मराठी’ला आणि ‘मराठी माणसाला’ कधीच एकटं पडू देणार नाही असा शब्दच दिला आहे. राज ठाकरे यांच्या पोस्टनंतर आता ठाकरे कुटुंबातील या नेक्स्ट जनरेशनचीही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.
काय म्हणाले अमित ठाकरे ?
अमित ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी –
मराठी माणसासाठी आमचा लढा सुरुच राहील !
निकाल काहीही असो… खंत एकाच गोष्टीची वाटते की, माझ्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतं, ते देण्यासाठी मला कदाचित अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण एक लक्षात ठेवा, माझं आणि तुमचं नातं फक्त एका ‘बटनापुरतं’ किंवा ‘मतापुरतं’ कधीच नव्हतं. राजकारणात जय-पराजय होतच असतो, पण माणसांची मनं जिंकणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.
तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि साथ दिली, ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे. माझा शब्द आहे तुम्हाला… सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक नेहमी धावून येतील. ‘महाराष्ट्र’ आणि ‘मराठी’ माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरुच राहील. खचून जाऊ नका… ‘मराठी’ला आणि ‘मराठी माणसाला’ कधीच एकटं पडू देणार नाही… हा शब्द आहे ठाकरेंचा !
जय महाराष्ट्र
अमित ठाकरे