Mumbai Crime News: मुंबईत (Mumbai) मागील 24 तासांत हत्येच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी सायंकाळी मालाड रेल्वे स्थानकावर झालेल्या घटनेची धग अद्याप शमलेली नसतानाच, भांडुप परिसरात आणखी एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. या सलग घटनांमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
शनिवारी सायंकाळी मालाड रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनमधून प्रवास करताना झालेल्या किरकोळ वादातून ओंकार शिंदे नावाच्या तरुणाने अलोक सिंग नावाच्या एका प्रोफेसरची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. ही घटना ताजी असतानाच, आता भांडुप (Bhandup) परिसरात राहणाऱ्या शंकरप्रसाद यादव ऊर्फ कल्ली या कुख्यात गुंडावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून किंवा वैयक्तिक दुश्मनीतून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हल्लेखोरांनी शंकरवर अत्यंत क्रूरपणे तब्बल 29 वेळा धारदार शस्त्राने वार केले. हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की, शंकर रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमी शंकरला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, शरीरावर खोलवर झालेल्या जखमा आणि झालेल्या अतिरक्तस्रावामुळे त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंकरचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेमुळे भांडुप परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत असून, आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सलग घडलेल्या या दोन हत्यांच्या घटनांमुळे मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मालाड हत्या प्रकरण! लोकलमधील वाढत्या गर्दीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, मात्र उपाययोजना कधी?