उमरगा : ग्रामीण भागाच्या विविध विकास कामांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातुन १२४ विविध योजनांची प्रभावी अमलबजावणी होणार आहे. 'कमळा' चे बटन १२४ योजनांवर काम करणार असल्याने मतदारांनी विचारपूर्वक भाजपसह मित्र पक्षाच्या उमेदवारांना विजयी करावे. असे आवाहन राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी केले.
उमरगा व लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भाजपसह मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता.दोन) कोराळ (ता.उमरगा) येथे आयोजित सभेत श्री. बावणकुळे बोलत होते. माजी मंत्री तथा भाजपचे लातूर जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, युवा नेते शरण पाटील, संताजी चालुक्य, मदन पाटील, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, महमंदरफी तांबोळी, योगेश राठोड, शहाजी पाटील, मोहन पणूरे, सिध्देश्वर माने, कैलास शिंदे, आदींची उपस्थिती होती. श्री. बावणकुळे पुढे म्हणाले की, विकसित धाराशिव जिल्ह्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. विविध योजनांसाठी केंद्र सरकारकडून एक लाख कोटी मिळणार आहेत. काँग्रेसने त्यांच्या सरकारच्या राज्यात लाडकी बहिण योजना बंद केल्या मात्र महाराष्ट्रात ही योजना अखंडपणे सुरू रहाणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'लखपती दिदी' योजना महिलांच्या अर्थकारणासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. असे सांगून मंत्री बावळकुळे यांनी सुजाण मतदारांनी मतांचे कर्ज द्यावे, त्याचे जामीनदार आम्ही आहोत. ग्रामीण भागात पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. अशी ग्वाही दिली. या वेळी मंत्री पाटील, आमदार राणा पाटील, जिल्हाध्यक्ष कुलकर्णी यांची भाषणे झाली. शरण पाटील यांनी प्रास्तविक केले. प्रा. डॉ. शौकत पटेल यांनी आभार मानले.
Permium|Delhi air pollution : दिल्लीतील प्रदूषणावरून 'आप' आणि भाजपमध्ये आरोपांची धुळवडधाराशिव, लातूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल
या वेळी माजी मंत्री बसवराज पाटील यांनी मंत्री बावणकुळे यांच्या कार्याचे कौतुक करून धाराशिव, लातूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल. असा विश्वास व्यक्त केला. दोन्ही जिल्ह्यात विकास कामांच्या मुद्दावर मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले.
शरण पाटील यांच्या कार्याचे कौतूक
शरण पाटील यांनी पुढाकार घेऊन फाऊंडेशनच्या माध्यमातून लोकवाटा भरून पाणंद रस्ते केले, त्याची दखल सरकारने घेतली आणि मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना सुरू केली. याचा फायदा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना होत असल्याचा उल्लेख मंत्री बावळकुळे यांनी केला. विशेष म्हणजे बसवराज पाटील यांनी पक्षाचा आदेश पाळत मुलाला संधी असताना निवडणुकीला उभे केले नाही, या बद्दल त्यांनी आभार मानले.