swt24.jpg
21510
सावंतवाडी ः संतश्रेष्ठ सद्गुरू संत रोहिदास महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना डॉ. शरद जाधव व मान्यवर.
संत रोहिदास महाराज समानतेचे प्रवर्तक
डॉ. शरद जाधव ः सावंतवाडीत ६५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः ‘‘संतश्रेष्ठ सद्गुरू रोहिदास महाराज हे केवळ चर्मकार समाजाचेच संत नव्हे, तर ते अखिल समाजाचे संत होते. उच्च-नीच कोणी नाही तर सर्व समान आहेत, अशी शिकवण त्यांनी दिली. तेव्हा यापुढील जयंती उत्सव सर्व बांधवांनी एकत्र येऊन साजरा करावा,’’ असे प्रतिपादन चर्मकार समाजोन्नती मंडळाचे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष डॉ. शरद जाधव यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाजोन्नती मंडळाच्या सावंतवाडी शाखेच्या वतीने संत रोहिदास महाराज यांची ६५० वी जयंती येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शरद जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, ‘‘भविष्यात संत रोहिदास यांचे विचार अंगीकारावेत. यासाठी त्यांचे जयंती उत्सव समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणावर साजरे करावेत.’’
चर्मकार समाजोन्नती मंडळाचे सावंतवाडी तालुका सचिव जगदीश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी ८ फेब्रुवारीला इन्सुली, सांगेली आणि कोलगाव येथे येथे संत रोहिदास जयंती साजरी केली जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमामध्ये संत रोहिदासांचे गाढे अभ्यासक पी. बी. चव्हाण यांनी संत रोहिदासांबद्दल अभ्यासपूर्ण माहिती दिली.
‘‘संत रोहिदासांनी शूद्र आणि अतिशूद्रांना परमेश्वराच्या भक्तीचाही अधिकार आहे, हे निक्षून सांगितले. सर्व समान आहेत, लहान-मोठा कोणी नाही. जगामध्ये सर्व सुखी आणि ज्यांना पोटभर अन्न मिळेल, असे राज्य आपल्याला अपेक्षित असल्याचे संत रोहिदासांनी सांगितले असून त्यांचे विचारत तत्कालीन प्रेरणादायी असल्याने त्यांना धर्मगुरूचा मान राजाने दिला होता,’’ असे त्यांनी सांगितले.
‘पाठ्यपुस्तकांत संत रोहिदासांचा समावेश व्हावा, तसेच शाळांमधून संत रोहिदास यांची जयंती साजरी करण्याचे आदेश शासनाने दिलेले असून त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सर्वांनी लक्ष द्यावे,’ अशी मागणी करण्यात आली.