वाशी/तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : डाळिंबाचा मुख्य हंगाम संपत आल्याने बाजारात या फळाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे; मात्र ग्राहकांकडून असलेली सततची मागणी लक्षात घेता त्याचे दर चढेच राहिले आहेत. सध्या एपीएमसी घाऊक बाजारात डाळिंब २०० ते २५० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात असून किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या डाळिंबासाठी ग्राहकांना ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो दर मोजावे लागत आहेत.
डाळिंब हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ मानले जाते. त्यामुळे वर्षभर बाजारात त्याला मागणी असते. विशेषतः उन्हाळ्यानंतर आणि पावसाळ्याच्या आधी डाळिंबाची मागणी वाढलेली असते; मात्र सध्या डाळिंबाचा हंगाम संपत चालल्याने बाजारात येणाऱ्या मालाचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी, मागणी आणि पुरवठ्यातील तफावत वाढून दरांवर त्याचा थेट परिणाम झाला आहे. सध्या सांगोला, फलटण, पंढरपूर, अकलूज आणि आसपासच्या भागांतून मर्यादित प्रमाणात डाळिंब बाजारात दाखल होत आहेत. याशिवाय गुजरात व राजस्थानमधूनही काही प्रमाणात डाळिंबांची आवक होत असली तरी ती बाजारातील मागणी पूर्ण करण्यास अपुरी ठरत आहे. त्यामुळे घाऊक बाजारातच डाळिंबाचे दर वाढले असून किरकोळ बाजारात ते आणखी महाग झाले आहे.
यापूर्वी हंगामाच्या काळात डाळिंब ६० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होते; मात्र सध्या त्याच डाळिंबाचे दर वाढले आहेत. तरीदेखील आरोग्याच्या कारणास्तव ग्राहक डाळिंबाची खरेदी करताना दिसत आहेत.
घाऊक व्यापारी पोपट शिंदे यांच्या मते, पावसाळा सुरू होईपर्यंत डाळिंबाची आवक वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सध्याचे दर आणखी काहीकाळ कायम राहतील, तसेच त्यात आणखी वाढ होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यानंतर नवीन हंगाम सुरू झाल्यावरच डाळिंबाच्या दरात काहीशी घट होण्याची शक्यता आहे, असे सांगितले.