बावडा येथे पुष्पहार अर्पण
esakal February 22, 2026 08:45 AM

बावडा, ता. २० : ‘‘राजमाता जिजाऊंपासून प्रेरणा व संस्कार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची स्थापना केली. जीवनात संकटे आली तरी त्यावर संयमाने कशी मात करावी, हे शिवचरित्रातून शिकावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन युवकांनी जीवनामध्ये वाटचाल करावी,’’ असे आवाहन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
बावडा (ता. इंदापूर) येथे शिवाजी एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणामध्ये शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास गुरुवारी (ता. १९) पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम पथक, झांज पथक तसेच लाठी- काठी या मर्दानी खेळाची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, शिवप्रतिष्ठान बावडा व छत्रपती शिवाजी तरुण पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चार हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली भव्य शोभायात्रा गावातून काढण्यात आली.
या शोभायात्रेमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा रथ, मावळ्यांच्या वेशातील घोडेस्वार विद्यार्थी, सेनापती तानाजी मालुसरे व वीर बाजीप्रभू यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, छत्रपती शिवाजी महाराज पालखी यांचा सहभाग होता. तसेच, लेझीम पथक, झांज पथक, तुतारी, लाठी-काठी पथक व मावळ्यांच्या वेशातील विद्यार्थी यामुळे गावातील वातावरण शिवमय झाले होते.

00948

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.