Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका
Saam TV February 23, 2026 01:45 PM
Nagpur: नागपुरात अवकाळी पाऊस; शेकडो पोती धान्य भिजलं

नागपूरात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो पोती धान्य भिजलं

एपीएमसी कळमना मार्केटमध्ये उघड्यावर असलेलं धान्य भिजलं

अवकाळी पावसाचा अंदाज असतानाही मार्केट प्रशासनाने धान्याचे पोती उघड्यावर ठेवली होती

उघड्यावर असलेलं धान्य भिजल्याने मोठं नुकसान

Yavatmal: यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

अवकाळी पावसाचा गहू या पिकाला फटका, यवतमाळच्या महागाव तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपलं

महागाव तालुक्यातील कोंदरी,वाकण या परिसरातील गहू या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान

रात्री दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार वादळ वाऱ्यासह हजेरी लावल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र शिवारात दिसून येते

Hingoli: हिंगोलीत पोलिस शिपाई चालक पदासाठी आले उच्च विद्याविभूषित तरुण

हिंगोलीत पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे आज पोलीस शिपाई चालक पदासाठी मैदानी चाचणी सुरू करण्यात आली आहे, पोलिसांच्या वाहनांवर चालक पदासाठी हिंगोलीत 32 जागा आहेत त्यासाठी तेरा हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत विशेष म्हणजे पोलीस शिपाई चालक पदासाठी चक्क उच्च विद्या विभूषित असलेल्या तरुणांनी पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेतला आहे या मध्ये बी टेक एम टेक बीएससी ऍग्री कॅम्पुटर इंजिनियर बी एच एम एस डॉक्टर आणि सिव्हिल इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Badlapur: बदलापूर अंडाशय रॅकेट प्रकरणी बडे मासे गळाला लागणार?

बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणी मोठी माहिती समोर येतीय. या प्रकरणातील बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. पोलिसांनी ठाणे बदलापूर, विठ्ठलवाडी, वांगणी परिसरात छापे टाकून 10 लाखाहून अधिक किंमतीचा औषध साठा जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. आता ही औषधं नेमकी कशासाठी वापरली जात होती. या रॅकेटमध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे. याचा तपास पोलिसांकडून केला जातोय.

Sindhudurg: फोंडाघाट परिसरात अवकाळी पाऊल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन ते दिवस वातावरणात बदल झाला असून कधी धुके तर कधी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच काल सायंकाळी फोंडाघाटासह परीसरात अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वाचीच तारांबळ उडाली. हवेत सुद्धा चांगलाच गारवा निर्माण झाला होता. आजही सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून उकाडा वाढला आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा फटका आंबा काजू पिकांना बसण्याची शक्यता असल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे

Praniti Shinde: संविधान वाचवण्याचा निर्णय घेऊन आम्ही राजकारणात आलोय- प्रणिती शिंदे

गेल्या वर्षभरात निवडणुका आणि आचारसंहितेतच वेळ गेला.मात्र आता विकासकामांची उणीव भरून काढणे आणि प्रत्यक्ष कामाला गती देणे हेच आमचे तत्त्व,प्रथा आणि परंपरा आहे. कोणतेही काम असो,आम्ही सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असून लोकशाही पद्धतीनेच कारभार करतोय. संविधान वाचवण्याचा निर्णय घेऊन आम्ही राजकारणात आलो.आज फार कमी लोक आहेत जे सविधान वाचवण्याचं काम करत आहेत,असं वक्तव्य काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रमात त्या बोलत होत्या. खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार निधीतून सोलापूर शहरातील अरविंद धाम येथे 10 लाखांचा काँक्रिट रस्ता पूर्ण करण्यात आला आहे.

Latur: लातूर शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी

लातूर शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली आहे, जिल्ह्यातल्या उदगीर जळकोट निलंगा या भागात रात्री पाऊस झाला,सकाळी लातूर शहरात अर्धा तास पाऊस झाला. कालपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने वातावरणात देखील बदल झालाय, दरम्यान या पावसामुळे काढणीला आलेल्या हरभरा ज्वारी गहू या पिकांसह आंबा आणि द्राक्ष फळबागाचे नुकसान झाले आहे

Yavatmal: यवतमाळमध्ये वीस दिवसात पाणी पातळीत साडेसात टक्क्यांनी घट

फेब्रुवारी महिना संपत असतानाच यवतमाळ जिल्ह्याचा पारा वाढू लागल्याने पाण्याची मागणी वाढली आहे वाढत्या उष्णतेमुळे जिल्ह्यातील 74 प्रकल्पांमधील पाणी पातळी अवघ्या 20 दिवसात साडेसात टक्क्यांनी खाली आलीये सध्या या प्रकल्पांमध्ये सरासरी 66.78% जलसाठा उपलब्ध आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा 13 टक्क्यांनी अधिक असल्याने यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी राहण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तविली आहे.

Indapur: सकल हिंदू समाजाकडून आज इंदापूर बारामती दौंड बंदच आवाहन

सकल हिंदू समाजाकडून आज इंदापूर दौंड आणि बारामती बंदच आवाहन करण्यात आले आहे .भिगवण घटनेच्या पार्श्वभूमीवर हे बंदच आवाहन करण्यात आले आहे.भिगवण प्रकरणातील आरोपीवर पोस्को अंतर्गत कारवाई यावी याशिवाय या प्रकरणातील जे जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, शिवाय संबंधित तरुणीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात यावं आणि सुरू असलेल्या अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा या मागणीसाठी हा बंदअप करण्यात आलाय.

Nashik: कुंभमेळ्यासाठी नाशिककरांवर आणखी २०० कोटींचं कर्ज, महापालिकेचा ग्रीन बॉण्ड लवकरच बाजारात

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका पुन्हा एकदा कर्ज उभारणीच्या तयारीत आहे. महापालिकेच्या २०० कोटी रुपयांच्या हरित कर्जरोख्यांना ‘सेबी’कडून अंतिम मंजुरी मिळाल्याने पुढील आठवड्यात हा ग्रीन बॉण्ड इश्यू बाजारात आणला जाणार आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांनाही हे बॉण्ड खरेदी करता येणार आहेत. कुंभमेळ्याच्या कामांसाठी यापूर्वीच २०० कोटी रुपयांचे म्युनिसिपल बॉण्ड उभारण्यात आले होते. त्यावर ७.८० टक्के व्याजदर देण्यात येत आहे. आता त्याच धर्तीवर आणखी २०० कोटी रुपयांचे हरित कर्जरोखे काढले जाणार असल्याने एकूण कर्जाचा आकडा ४०० कोटींवर पोहोचणार आहे. त्यामुळे आगामी काही वर्षे महापालिकेला भांडवली कामांपेक्षा कर्जफेडीवरच अधिक भर द्यावा लागणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. या नव्या ग्रीन बॉण्डमधून मलनिस्सारण योजनेअंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे उभारणे आणि मुकणे धरण थेट पाइपलाइन विस्तारित योजनेसाठी निधी वापरण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून १३ टक्के प्रोत्साहनपर अनुदान मिळणार असून सुमारे २६ कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ महापालिकेला मिळणार आहे. आज महापौर आणि आयुक्त पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा करणार आहेत. मात्र प्रश्न असा की कुंभाच्या तयारीसाठी घेतले जाणारे हे कर्ज भविष्यात नाशिककरांच्या खांद्यावर किती आर्थिक ओझं वाढवणार? कुंभाची तयारी की कर्जाचा डोंगर ? यावर आता शहरात चर्चा सुरू झाली आहे.

Pune: पुणे बाजार समिती चौकशी अहवालावर नाराजी सविस्तर अहवालाचे आदेश

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरकारभाराबाबत सादर करण्यात आलेला चौकशी अहवाल त्रोटक व मोघम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शासनाच्या आदेशानुसार नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालावर पणन संचालक संजय कदम यांनी नाराजी व्यक्त केली.

शासन पत्रातील सर्व मुद्द्यांवर सविस्तर अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश

जिल्हा उपनिबंधक, सभापती व सचिवांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी विधीमंडळात लक्षवेधी मांडल्यानंतर जयकुमार रावल यांनी फुल बाजारातील परवाने व विना निविदा ठेके रद्द करण्याची घोषणा केली होती.

Pune: पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम संपन्न

संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज एवं निरंकारी राजपिता रमीत जी यांच्या पावन मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर एकाच वेळी राबविण्यात आले.

या अभियाना अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कऱ्हा, मांडवी, आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलाव अशा ४२ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत पुण्यामध्ये मुळा मुठा नदीच्या विविध घाटांवर विशाल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

1600 हून अधिक ठिकाणी तसेच पुण्यामध्ये ४२ ठिकाणी एकाच वेळी या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज पुन्हा आक्रमक,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद

आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.आमदार अमित गोरखे आक्रमक पवित्र घेणार असून त्यांच्या समर्थक व समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचं अ ब क ड नुसार वर्गीकरण करावी अशी मातंग समाजाची मागणी आहे.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही याबाबत निर्णय न झाल्याने समाजात नाराजी असून अधिवेशनात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.धाराशिव मधूनही मोठ्या प्रमाणात समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.आमच्या मागण्यासाठी अधिक तिव्र व आक्रमक

आंदोलन करण्याचा इशारा समाज बांधवांनी दिलाय

खासदार बळवंत वानखडे उतरले रस्त्यावर

“केंद्र सरकार जाणीवपूर्वक मनरेगा कायदा कमकुवत करून तो इतर योजनांमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न करत आहे.असा आरोप काँग्रेस पक्षाचे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे,ग्रामीण व आदिवासी मजुरांच्या हक्काची कायदेशीर हमी काढून घेण्याचा हा डाव असून अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील ४० हजार मजुरांचे आयुष्य या योजनेवर उभे आहे. मजुरांच्या हक्कावर कुठलाही घाला घातला तर रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष उभारू,असा थेट इशारा खासदार बळवंतराव वानखडे यांनी देत मेळघाट मध्ये खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वात ‘मनरेगा बचाव यात्रा काढण्यात आली यावेळी शेकडो मजूर या यात्रेत सहभागी झाले होते...यावेळी खासदार वानखडे यांनी मजुरांच्या रांगेत बसून त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या न्याय्य हक्कासाठी संसदेपासून रस्त्यापर्यंत लढण्याची ठाम ग्वाही त्यांनी मजुरांना दिली. मनरेगा मजुरी किमान ४०० रुपये प्रतिदिन करण्यात यावी आणि १०० दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी प्रभावीपणे कायम ठेवावी. केंद्र सरकार राज्यांवर आर्थिक बोजा टाकून योजना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला,

दुपारी १ ते हडपसर ते दिवेघाट रस्ता बंद राहणार

वाहतूक शाखा पोलिसांनी काढले आदेश

आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट दरम्यान, दिवेघाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी उद्या ब्लास्टिंग करण्यात येणार आहे.

या कामामुळे दुपारी १ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.

तरी या कालावधीत नागरिकांनी व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून करण्यात येत आहे.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांनी केले...

निगडे बुद्रुक येथे विहिरीत पडलेल्या बछड्यास वनविभागाकडून जीवदान

निगडे बुद्रुक (ता.राजगड)येथील शेतकऱ्याच्या विहिरीत पडलेल्या बछड्यास वाचविण्यात यश आले असल्याची माहिती राजगड वन विभागाकडून देण्यात आली. बावधन येथील प्राणी उपचार केंद्रातील रेस्क्यू टीमच्या सहाय्याने बछड्यास विहिरीतून वर काढण्यात आले.

संभाजीनगरमध्ये राडा

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याला एका दारुड्याने शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पती-पत्नीच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सोमनाथ मुरलीधर गिरी असे गुन्हा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ट्रॅफिक पोलिस कर्मचारी संतोष खरात हे हायकोर्ट सिग्नलवर ड्युटी करीत होते. त्यावेळी दुचाकीस्वार सोमनाथ हा डिव्हायडर जवळून गाडी चालवत होता. त्यास थांबवल्यावर तो दारू पिल्याचे आढळले. चौकशी सुरू केल्याने त्याने हुज्जत घालत शिवीगाळ सुरू केली. तुम्हाला दोन दिवसात बघून घेतो अशी धमकीही दिली. खरात यांच्या अंगावर हात उचलला. त्याने पत्नीला बोलावून घेतले. पत्नी आल्यानंतर दोघांनी वाद सुरू केला. शिवीगाळ करीत लोटालोट केली आणि फिर्यादीला चापट मारली. सोमनाथ हा रस्त्यावर जाऊन झोपला आणि वाहतुकीला आडथळा निर्माण केला. नियंत्रण कक्षाला माहिती देऊन पुंडलिकनगर, दामिनी पथक बोलावले. रस्त्याने जाणाऱ्यांनीही पती-पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिस आल्यानंतर दोघांना ताब्यात घेत पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आणले आणि त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

अवमानकारक वक्तव्यामुळे कबनूरमध्ये तणाव, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा चौकात तासभर रास्ता रोको

कबनूर इथ भाजी - मंडईशेजारी लावण्यात आलेल्या महापुरुषांच्या फलकाबाबत एका महिलेने अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप समोर आल्यानंतर रविवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ महिला आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. संबंधित महिलेवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.