होळीत रंगाचे बेरंग होऊ नये यासाठी पोलिसांची विशेष खबरदारी
esakal March 02, 2026 02:45 AM

होळी-रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलिस सज्ज
तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त : हुल्लडबाजांवर करडी नजर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : होळी आणि रंगपंचमीचा सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाने कंबर कसली आहे. सणाचा आनंदोत्सव साजरा करताना रंगाचा बेरंग होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेत आयुक्तालय कार्यक्षेत्रात तब्बल तीन हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात केला आहे. शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारेही लक्ष ठेवले जाणार आहे.
आयुक्तलयाच्या हद्दीत ५६९ सार्वजनिक आणि २,१०७ खासगी अशा दोन हजार ६७६ होलिका दहन होणार आहेत. या उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाने मोठ्या प्रमाणावर पथके तैनात केली आहेत. यामध्ये पाच पोलिस उपायुक्त, १० सहाय्यक पोलिस आयुक्त, ९७ पोलिस अधिकारी, २६७ सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, दोन हजार ५५२ पोलिस अंमलदार (पुरुष व महिला) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त एसआरपीएफच्या दोन तुकड्या आणि शहर वाहतूक शाखाही सतर्क राहणार आहे. दरम्यान, या सण, उत्सवादरम्यान महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी काही संशयित हालचाली व वस्तू दिसून आल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांशी अथवा ठाणे शहर नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधावा. सर्व नागरिकांनी हे सण, उत्सव उत्साहाने शांततेत साजरा करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्रमुख सुरक्षा उपाययोजना
१. शहरातील महत्त्वाच्या चौकांवर आणि गर्दीच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास लक्ष ठेवले जाणार आहे.
२. महिला छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी निर्भया पथके गस्त घालणार आहेत.
३. हॉटेल्स, लॉजेस, ढाबे आणि सोसायटी परिसरात विशेष तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत.
४. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर ब्रेथ अनालायझरद्वारे तपासणी करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
५. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून, विहित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.