आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य म्हणतात जर कोणत्याही राष्ट्राची खरी संपत्ती काय असेल तर ती म्हणजे तिथले तरुण, ज्या राष्ट्रात तरुणांची संख्या जास्त त्या राष्ट्राचा विकास अधिक गतीने होतो. ते राष्ट्र सर्वशक्तीमान होतं. पण हे केव्हा शक्य आहे, जेव्हा त्या तरुणांवर योग्य संस्कार झालेले असतील, कष्ट करण्याची त्यांची तयारी असेल आणि ते सुशिक्षित असतील. जर तुम्हाला अशा तरुणांची पिढी घडवायची असेल तर त्यांच्यावर लहाणपणापासून काही संस्कार करणं गरजेचं असतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलानं भविष्यात खूप मोठं व्हावं, आपलं आपल्या कुटुंबाचं नाव जगात उज्वल करावं, परंतु कोणताही मुलगा आई-विडलांची ही अपेक्षा तेव्हाच पूर्ण करू शकतो, जेव्हा त्याच्यावर योग्य संस्कार झालेले असतील. मग आपल्या मुलाला जर त्याच्या आयुष्यात यशस्वी करायचं असेल तर नेमकं काय करायचं? याबद्दल चाणक्य यांनी माहिती दिली आहे.
शिस्त – चाणक्य म्हणतात आयुष्यात जर सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे शिस्त. बेशिस्त व्यक्ती किंवा ज्याच्यावर शिस्तीचे संस्कारच झाले नाहीत, असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकत नाही, कारण कोणतंही काम करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिस्त, त्यामुळे प्रत्येक आई -वडिलांनी आपल्या मुलांवर शिस्त पालनाचे संस्कार करावेत असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
चांगले शिक्षण – चाणक्य म्हणतात शिक्षणामधूनच सक्षम पिढी घडत असते, जर तुम्ही तुमच्या मुलांना चांगले शिक्षण उपलब्ध करून दिले, तर त्या शिक्षणामुळे त्यांना चांगल्या ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळतील आणि भविष्यात ते एक यशस्वी व्यक्ती होतील. त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुख सुविधा असतील, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
संगत – चाणक्य म्हणतात संगत माणसाचं कल्याण देखील करु शकते आणि त्याला बिघडू देखील शकते, त्यामुळे आपला मुलगा नेमका कोणाच्या संगतीमध्ये आहे, हे आई-वडिलांनी नेहमी तपासून पाहिलं पाहिजे, कारण संगत जर चांगली असेल तर अशी मुलं त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतात.
चारित्र्य – चाणक्य म्हणतात चारित्र्याला जपलंच पाहिजे, चारित्र्याला डाग लागता कामा नये, त्यामुळे मुलांवर त्या पद्धतीने संस्कार झाले पाहिजेत.