Maharashtra Weather Update: राज्यात उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. पुणे शहरात उन्हाचा तडाखा (Heat Alert) वाढला आहे. शहराचा पारा 32 वरून 36 अंशावर पोहोचला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाने 36 अंशाचा आकडा गाठला आहे. हे यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान (Heat Alert) आहे. येत्या काही दिवसात तापमान 40° जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणेकरांनी बारा ते चार या वेळात बाहेर फिरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.(Heat Alert)
वाढत्या उन्हामुळे आणि तापमानामुळे डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा (Heatstroke) धोका वाढतो आहे. यासाठी प्रशासनाने नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नागरिकांनी शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत थेट उन्हात जाणे टाळा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी आणि लिंबू सरबत, ताक यांसारख्या पेयांचे सेवन करा. बाहेर पडताना सुती आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे.(Heat Alert)
फेब्रुवारी महिना सरताच सोलापूरच्या तापमानाने आता चांगलीच उसळी घेतली आहे. काल मंगळवारी, ३ मार्च रोजी सोलापूर शहरात हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून, कमाल तापमान ३८.०° सेल्सिअस (१००.४° फॅरेनहाइट) पर्यंत पोहोचले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांतच उन्हाने आपला इंगा दाखवायला सुरुवात केल्याने सोलापूरकर उकाड्याने हैराण झाले आहेत.
सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून, दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत. हवेतील आर्द्रता ३४ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने कोरड्या उन्हाचा त्रास अधिक जाणवत आहे. किमान तापमानही २२.९°C वर पोहोचल्याने आता रात्रीच्या वेळीही गारवा कमी होऊन उकाडा जाणवू लागला आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाहेर पडताना सुती कपड्यांचा वापर करावा, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे.पुढील अंदाज: येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता असून, उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात सध्या उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत बुधवारी आणि गुरुवारी हवेतील आर्द्रता वाढल्याने अस्वस्थता अधिक जाणवेल. मुंबईचे तापमान कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस आणि किमान २४ ते २६ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. समुद्रकिनारी असलेल्या भागांत दमट हवामान असेल आणि उन वाढल्याने उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे.