Vishwas Patil : छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख आढळत नसल्याची कबुली लेखक विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर दिली. तसेच त्यांच्या ‘संभाजी’ (Sambhaji) या कादंबरीतील जना परीटिण, गोविंद नाक, दामाजी पाटील आणि पाटलीण यांसारखी पात्रे काल्पनिक असल्याचेही त्यांनी उलटतपासणीत मान्य केले.
कोरेगाव भीमा प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर शुक्रवारी दिवसभर सुनावणी झाली. राज्य शासनाचे विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे यांनी विश्वास पाटील यांची सविस्तर उलटतपासणी घेतली. या वेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पाटील यांनी त्यांच्या कादंबरीतील अनेक उल्लेख काल्पनिक असल्याचे स्पष्ट केले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'संभाजी' या कादंबरीतील महाराजांच्या अंत्यविधीवरील कथनावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाले होते. काही गटांनी महाराजांचा अंत्यविधी विशिष्ट व्यक्तीने केला अशी भूमिका घेऊन दोन समुदायांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यात कोरेगाव येथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, ज्याची चौकशी सध्या सुरू आहे.
उलटतपासणीदरम्यान अॅड. शिशिर हिरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विश्वास पाटील म्हणाले की, “संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख आढळत नाही. ‘संभाजी’ या कादंबरीतील जना परीटिण, गोविंद नाक, दामाजी पाटील आणि पाटलीण ही पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत.” संभाजी ही कादंबरी भूभाग आणि काही तथ्य यावर आधारित कल्पना विलास आहे, असे पाटील यांनी सांगितल्याची माहिती अॅड. हिरे यांनी दिली. तसेच कादंबरीतील लिखाणाचा गैरवापर करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो निषेधार्ह असल्याचेही विश्वास पाटील यांनी उलटतपासणीदरम्यान नमूद केले, अशी माहिती अॅड. शिशिर हिरे यांनी दिली आहे. तसेच, जेधे शकवली, मासीरे आलमगिर, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान या तत्कालीन इतिहासकारांचा उल्लेख करत विश्वास पाटील यांच्या 'संभाजी' कादंबरीमधील कल्पनाविलासाचा फोलपणा कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर मांडण्यात आला.
आणखी वाचा