प्रेमासाठी काहीपण! धर्म बदलला, 10 वर्षे संसार केला, 4 मुले, पण सासरची मंडळी… नेमकं काय घडलं?
Tv9 Marathi March 08, 2026 06:45 PM

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीने प्रेमविवाहासाठी धर्म परिवर्तन केले. मात्र, लग्नानंतर सासरच्या छळामुळे तिचे आयुष्य नरक बनले. आता १० वर्षांनी तिने हिंदू संघटनांच्या मदतीने सुखरूप सुटका करून हिंदू धर्मात परत प्रवेश घेतला आहे. या धक्कादायक प्रकरणाने शहरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपींवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

नेमकं काय घडलं?

रुचिता (बदललेले नाव) या तरुणीने २०१६ मध्ये घरच्यांचा विरोध पत्कारून ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर येथील प्रसिद्ध उद्योगपतीशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि नाव बदलून अलिझा ठेवले. मात्र, लग्नानंतर नवरा आणि सासरच्या सदस्यांकडून तिचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला, असा आरोप महिलेने केला आहे.

मागील दहा वर्षांत या दांपत्याला चार मुले झाली. मुले आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तिने अनेकदा पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी दखल घेतली नाही, असे तिने सांगितले. अलीकडेच ती काही हिंदू संघटनांच्या संपर्कात आली. त्यांच्या मदतीने तिची सुखरूप सुटका झाली आणि रविवारी (७ मार्च २०२६) शुद्धीकरणाची प्रक्रिया राबवण्यात आली. होम-हवन आणि मंत्रोच्चाराद्वारे तिला पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला. तिचे नवे नाव अद्या ठेवण्यात आले आहे.

रुचिताने माध्यमांशी बोलताना सांगितले, “२०१६ मध्ये मीरा-भाईंदर येथील उद्योगपतीशी प्रेमविवाह केला, पण ही मोठी चूक ठरली. लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून सतत छळ सुरू झाला. धर्मांतर करूनही माझी स्थिती सुधारली नाही. चार मुलांच्या सुरक्षिततेसाठी मी हे पाऊल उचलले. अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. हिंदू संघटनांच्या मदतीने आता मी स्वतंत्र झाले आहे.”

या प्रकरणाने पुण्यात धर्मांतर, प्रेमविवाह आणि कौटुंबिक छळ याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सायलीने आतिफ तासे आणि सासरच्या सदस्यांवर कारवाईची मागणी केली असून, पोलिसांनी याबाबत तपास सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.