32805
जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे!
राष्ट्रीय पिछडा वर्ग; सिंधुदुर्गनगरीत मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २३ : राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाच्यावतीने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसह विविध मुद्यांवर देशभर टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्यात येत आहे. याचा तिसरा टप्पा म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, सिंधुदुर्गच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला. हे आंदोलन भारत मुक्ती मोर्चा आणि ओबीसी मोर्चाच्या नेतृत्वाखाली संविधानिक चौकटीत करण्यात आले. केंद्राने कॅबिनेटमध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असला, तरी जनगणनेच्या अधिसूचनेत ओबीसी जातींसाठी स्वतंत्र ‘कॉलम’ दिलेला नाही. हा ओबीसी समाजावर अन्याय असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे आगामी राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी आणि त्यांच्या पोटजातींसाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट करावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
याशिवाय, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) व ओबीसींच्या हितासाठी मजबूत ‘यूजीसी इक्विटी रेग्युलेशन’ लागू करावे, २०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून सूट द्यावी, अशा मागण्यांचाही यात समावेश आहे. हे आंदोलन चार टप्प्यांत नियोजित असून, पहिल्या टप्प्यात ६ मार्चला ७२५ जिल्ह्यांत राष्ट्रपतींना निवेदन दिले होते. दुसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन केले, तर आज तिसऱ्या टप्प्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास जाधव, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ सिंधुदुर्गच्या जिल्हा प्रभारी अक्षयता जाधव, संतोष पाटणकर उपस्थित होते.