Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल
esakal April 02, 2026 12:45 AM

भिवंडी : शहरात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या भागांतून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांत अज्ञात व्यक्तींनी फूस लावून मुलींचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त होत असून, शांतीनगर आणि कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथील १४ वर्षीय मुलगी शनिवारी (ता. २८) स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये जाते, असे सांगून घरून निघाली होती; मात्र शाळा सुटल्यानंतरही ती घरी परतलीच नाही. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेऊनही तिचा पत्ता न लागल्याने, वडिलांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाची तक्रार दिली आहे.

Mumbai News: पदभरतीसाठी हालचाली, महापालिका ‘त्या’ वरिष्ठ प्रशासकीय जागा भरणार

दुसरी घटना कोनगाव परिसरात घडली आहे. येथील १५ वर्षीय मुलगी शनिवारीच घराशेजारील दुकानातून भाजीचा मसाला आणण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी ती परतली नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. कोणातरी अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी कोनगाव पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.

पालकांमध्ये भीतीचे वातावरण

एकाच दिवशी दोन मुली बेपत्ता झाल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस दोन्ही प्रकरणांतील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत असून, संशयितांचा शोध घेतला जात आहे.

Mumbai News: महिलेसह अल्पवयीन मुलाचा दिव्यांग प्रवाशावर हल्ला, लोकलमधील संतापजनक प्रकार; आरोपींवर गुन्हा दाखल
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.