पामबीच मार्गावरील कमानी हटवण्यावर टोलवाटोलवी
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबईतील पाम बीच मार्गावरील अनधिकृत लोखंडी कमानी हटवण्याच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत. राज्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत या कमानी अनधिकृत असल्याचे मान्य करीत तातडीने कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र त्या निर्देशांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. यावर माजी विरोधी पक्षनेते नामदेव रामा भगत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत नोव्हेंबर २०२५पासून तक्रार प्रलंबित असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे या कमानी अधिकृत की अनधिकृत, याबाबत पालिकेकडून स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत असल्याची चर्चा आहे.
चौकट
सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न
पाम बीचसारख्या वर्दळीच्या मार्गावर उभारलेल्या या कमानी आणि त्यावरील डिजिटल जाहिरातींमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत आहे. परिणामी अपघाताचा धोका वाढला असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
चौकट
स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी
या पार्श्वभूमीवर कमानींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांची सुरक्षितता तपासावी, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा जाहिरातदारांचे हित जपले जात असल्याचा आरोपही पुढे येत असून, प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.