सतरा गावांतील नागरिकांना
समाधान शिबिरात लाभ
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. १२ : महसूल विभागाचे सर्व विभाग एकाच छताखाली आणून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित केलेले ''छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर'' दापोली तालुक्यातील गावतळे येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिरामध्ये वाकवली मंडळ अधिकारी क्षेत्रातील १७ गावांतील नागरिकांनी विविध दाखल्यांसाठी आणि शासकीय कामांसाठी मोठी गर्दी केली होती.
या शिबिराचे उद्घाटन करताना तहसीलदार अर्चना बोम्बे म्हणाल्या, "आम्ही या शिबिरांच्या माध्यमातून थेट लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून ग्रामीण भागातील जनतेला दाखले मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर होतील. सर्वच विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी येथे उपस्थित असल्याने कामात गती येत आहे." तसेच उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सांगितले, "जोपर्यंत ग्रामस्थ आपली कामे घेऊन येतील, तोपर्यंत हे शिबिर सुरू ठेवले जाईल. वाकवली मंडळ अधिकारी क्षेत्रातील १७ गावांतील ग्रामस्थांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या शिबिराला उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोम्बे, किशोर देसाई, प्रभाकर गोलांबडे, निलेश शेठ, विधी पवार, विशाल म्हाबदी, एन. वाय. पवार, उत्तम पवार, प्रदीप म्हाबदी, वाकवली मंडळ अधिकारी क्षीरसागर मॅडम, डॉ. प्रियांका शिंदे आणि विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.