राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी भयंकर उष्णता अशी स्थिती आहे. सध्याच्या घडीला राज्यावर दुहेरी संकट आहे. 15 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. हेच नाही तर स्थिती खूप जास्त गंभीर आहे. पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. उष्णघाताची रूग्ण सापडत आहे. अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. दुसरीकडे पावसाचाही मोठी इशारा देण्यात आला. आज राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. अमरावती आणि अकोल्यात 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर नागपूर, सोलापूर, मालेगाव, गडचिरोली आणि यवतमाळ येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. कोकण, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळेल.
वाशिम जिल्ह्यात उष्णतेचा पारा प्रचंड वाढला असून मागील आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. तापमान तब्बल 43.4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. या वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला असून आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. एरव्ही उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक रसवंतीगृहांचा आधार घेत. मात्र, सध्या उष्णतेची झळ इतकी तीव्र आहे की नागरिक बाहेर पडणंही टाळत आहेत.
प्रशासनाकडून नागरिकांनी या उष्णतेच्या काळात काळजी नक्की काय घ्यावी, याबाबतच्या सूचना जारी केल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये 41 चा आकडा तापमानाने गाठल्याने नागरिक हैराण होत आहे. 18 एप्रिल पर्यंत उष्णतेची लाट असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. जळगावात वाढत्या तापमानाचा आणि उष्णतेचा केळीच्या बागांना देखील मोठा फटका.
आज 18 एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंद क्लासेस यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. उष्णता अधिक तीव्र होणार असल्याने प्रशासनाकडून दक्षता म्हणून निर्णय घेतला. शक्यतो अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराच्या बाहेर दुपारी पडू नका, असेही आवाहन केले जात आहे. जळगावत तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचल्याने केळीच्या बागांना उन्हाचा तडाखा बसत आहे. वाढत्या तापमानामुळे केळीचे पान पिवळी पडत असून पाने जळून जमिनीवर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.