ठाणे : उल्हासनगर महानगरपालिकेच्या महासभेत शिवसेना आणि भाजपामध्ये तीव्र संघर्ष उफाळून आला. महापौर अश्विनी निकम यांनी अचानक काँग्रेसच्या एकमेव नगरसेविकेला विरोधी पक्षनेते म्हणून घोषित केल्याने हा वाद पेटला. या निर्णयानंतर 78 सदस्यीय सभागृहात भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार विरोध दर्शवला. नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत गदारोळ सुरू असतानाच महापौरांनी ‘जन गण मन’ सुरू करून सभा तहकूब केली.
भाजपने या निर्णयाला ‘युती धर्माचा भंग’ असे संबोधत शिवसेनेवर टीका केली. भाजपचे गटनेते राजेश वधारिया यांनी सांगितले की, कायद्यानुसार एकच नगरसेवक असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकत नाही. त्यामुळे हे पद भाजपाला मिळायला हवे होते, असा दावा त्यांनी केला.
भाजपाने आरोप केला की हा विषय कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक सभागृहात मांडण्यात आला. त्यामुळे भाजपाला आपली भूमिका मांडण्याची संधीच मिळाली नाही. या प्रकरणावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांच्या निर्णयाचे समर्थन केले. काँग्रेस हा एकमेव विरोधी पक्ष असल्याने त्यांच्या नगरसेवकाची निवड करण्यात आली, असे सांगण्यात आले. विरोधी पक्षनेते निवडण्याचा अधिकार महापौरांचा विशेषाधिकार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
सत्तेत सहभागी असताना विरोधी पक्षनेतेपदाची मागणी कशी केली जाऊ शकते? असा प्रश्न शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला. या घटनेमुळे शिवसेना-भाजपा युतीतील मतभेद उघड झाले असून पुढील काळात तणाव वाढण्याची शक्यता आहे.
नेमणुकीच्या विरोधात झालेल्या गोंधळानंतर आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सर्व गटनेत्यांना बैठकीसाठी बोलावले. मात्र या बैठकीदरम्यान भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आयुक्त दालनात शिरण्याचा प्रयत्न करत धक्काबुक्की केली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना अटकाव केल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. अखेर पोलीस निरीक्षक शंकर आवताडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 19 (1) (ब) नुसार विरोधी बाकावरील सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या पक्षाच्या गटनेत्याला विरोधी पक्षनेतेपद दिले जाते. मात्र उल्हासनगरमध्ये काँग्रेसचा एकच नगरसेवक असून तोच विरोधात बसलेला असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा