सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत आयोजित चर्चा निष्फळ ठरली. ही चर्चा अनिर्णित राहिल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अठरा मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या दालनात कर्मचारी संघटनेची संध्याकाळी पाच वाजता बैठक झाली.
सुधारित निवृत्ती वेतन योजना व इतर चार मुद्द्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल व तो निर्णय संघटनेला उद्या (गुरुवार) कळविला जाईल, असे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले.
या बैठकीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा एक बैठक झाली. उद्या संध्याकाळी साडेचार वाजता कर्मचारी संघटनेच्या सुकाणू समितीची बैठक होईल. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल. त्यामुळे तूर्तास उद्यासुद्धा सुरू असलेले संप आंदोलन सुरूच राहील, अशी घोषणा कर्मचारी संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी केली.





