मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे लोकलला मुंबईची जीवन वाहिनी देखील म्हटले जाते. अशातच आता मुंबई लोकलमध्ये प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. एका प्रवाशावर चक्क चाकूने जीवघेणा हल्ला झाला आहे. विठ्ठलवाडी–उल्हासनगरदरम्यान हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. सामानाची आणि पैशांची लूट करण्यासाठी हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
लोकल ट्रेनमध्ये प्रवाशावर हल्लासमोर आलेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशावर चाकू हल्ला झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीध्ये कैद झाला आहे. या घटनेत प्रवासी नितेश कुमार शहा किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना समोर आल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर आरोपी जोगिंदर सिंग लबानाला अटक करण्यात आली असून तो उल्हासनगरमधील सराईत गुन्हेगार असल्याची माहितीही समोर आली आहे. कल्याण आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी आरोपीला ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. धावत्या ट्रेनमध्ये असा प्रकार घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जखमी प्रवाशाने काय सांगितले?या घटनेबाबत बोलताना प्रवासी नितेश कुमार शहा यांनी सांगितले की, ‘मी दीडच्या गाडीने खोपोलीला चाललो होतो. त्यावेळी माझा मोबाईल ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात त्याला यश आले होते, मात्र मी त्याला विरोध केला असता आरोपीने चाकू बाहेर काढला आणि माझ्यावर हल्ला केला.’ या झटापटीत नितेश कुमार शहा यांच्या हाताला जखम झाली आहे. त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. यात आरोपीच्या हातात चाकू दिसत आहे, तसेच तो शिवीगाळही करत असल्याचे दिसत आहे. आता आरोपीला अटक करून त्याची कसून चौकशी केली जात आहे. आरोपीने याआधी असे कृत्य केले आहे का याचाही तपास केला जात आहे.