Nitesh Rane : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडलात मंत्री असलेले नितेश राणे सर्वात मोठा धक्का बसला आहे. त्यांना थेट एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सोबतच या कारावासासह एक लाख रुपये दंड घेण्याचाही आदेश न्यायालयाने दिला आहे. हा निकाल म्हणजे नितेश राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे नितेश राणे यांच्या वकिलांनी आता समोर आलेल्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला?चिखलफेक प्रकरणात शांततेचा भंग केल्याप्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याच निर्णयाअंतर्गत नितेश राणे यांना एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच त्यांना एक लाखाचा दंडही भरावा लागणार आहे. कणकवलीच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
नेमके प्रकरण काय?एका रस्त्याच्या पाहणीप्रकरणी नितेश राणे यांनी अभियंते प्रकाश खेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती. तसेच त्यांना बांधूनही ठेवण्यात आले होते. सोबतच खेडेकर यांच्या कपड्यांना धरून त्यांच्याशी बोलताना असभ्य वर्तन करण्यात आले होते. या प्रकरणाचा व्हिडीओहीदेखील तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता. हे प्रकरण समोर आल्यानंत राणे यांच्यावर चांगलीच टीका करण्यात आली होती. नितेश राणे या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. तशी माहिती राणेंच्या वकिलांनी दिली आहे.
वकिलाने नेमकं काय सांगितलं आहे?नितेश राणे यांच्याविरोधात 353 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या आरोपांतून नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. परंतु न्यायालयाने भारतीय दंडविधान कलम 504 म्हणजेच सार्वजनिक शांततेचा भंग होणे, शांतता भंग व्हावी यासाठी कोणालातरी उद्युक्त करणे या कलमाअंतर्गत नितेश राणे यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना एक महिन्याचा कारावास, एक लाख रुपये दंड अशी शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली आहे, असे वकिलने सांगितले आहे. दरम्यान, आता मुंबई उच्च न्यायालयात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.