आयपीएल स्पर्धेचा 19 वा मोसम निर्णायक वळणावर आहे. प्रत्येक संघाने किमान 9 आणि जास्तीत जास्त 10 सामने खेळले आहेत. काही संघांनी दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. त्यामुळे त्या संघांना प्लेऑफसाठी अवघ्या 2-3 विजयांची गरज आहे. तर काही संघांचा प्लेऑफसाठी संघर्ष सुरु आहे. इथून एक पराभवही प्लेऑफचं स्वप्न भंग करणारा ठरु शकतो. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आतापर्यंत एकूण 47 सामन्यांचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं आहे. तर 48 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे सामना पावसामुळे रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स 5 मे रोजी आमनेसामने असणार आहेत. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा सामना हवामानामुळे प्रभावित होऊ शकतो. हवामान विभागाने संध्याकाळी ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात संध्याकाळी 6 पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच गारपिट होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, संध्याकाळी 7 नंतर पावसाची शक्यता नाही. मात्र त्याआधी पावसाची आणि गारपिटीची शक्यता कायम आहे. त्यामुळे सामन्याला विलंबाने सुरुवात होऊ शकते. तसेच सामना रद्द होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सामना पावसामुळे रद्द झाल्यास क्रिकेट चाहत्यांनी निराशा होऊ शकते. तसेच दोन्ही संघांसाठी सामना रद्द होणं हे नुकसानकारक ठरु शकतं.
दिल्ली आणि चेन्नईचा प्लेऑफसाठी संघर्ष सुरु आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना रद्द होणं परवडणार नाही. त्यामुळे दोघांपैकी कोणत्या संघाला सामना रद्द झाल्यास सर्वाधिक फटका बसणार? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. पॉइंट्स टेबलमधील स्थिती पाहता दोन्ही संघांना सामना रद्द झाल्यास इतका मोठा फटका बसणार नाही. मात्र त्यांच्या अडचणीत वाढ होणार इतकं मात्र निश्चित आहे.
दरम्यान दिल्ली आणि चेन्नई या दोघांचा 5 मे रोजी होणारा आयपीएल 2026 स्पर्धेतील 10 वा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 9 पैकी प्रत्येकी 4-4 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांच्या खात्यात 8-8 गुण आहेत. नेट रनरेटमुळे चेन्नई सहाव्या आणि दिल्ली सातव्या स्थानी आहे. उभयसंघातील सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळेल. त्यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी 9-9 गुण होती. त्यानंतरही दोन्ही संघांचे प्रत्येकी 4-4 सामने शेष राहतात. त्यामुळे आता नवी दिल्लीतील सामन्याचा काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.