सोनिया गांधी, उद्धव ठाकरे ते हेमंत सोरेन यांचा फोन आलेला, अखिलेश यादव उद्या बंगालमध्ये, ममता बॅनर्जींनी अपडेट दिली 
युवराज जाधव May 05, 2026 09:13 PM

Mamata Banerjee कोलकाता : पश्चिम बंगालच्या मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आज पत्रकार परिष घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा देणार नसल्याचं म्हटलं. याशिवाय ममता बॅनर्जींनी निवडणूक निकालानंतर कोणत्या कोणत्या नेत्यांचे फोन आले याची नावं पत्रकार परिषदेत सांगितली.  पश्चिम बंगालमधील 293 पैकी 80 जागांवर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा विजय  झाला. ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि हेमंत सोरेन यांचा फोन आल्याचं सांगितलं. 

ममता बॅनर्जी पुढं म्हणाल्या की इंडिया आघाडीतील सर्व पक्षांकडून ते पूर्णपणे आमच्या सोबत असल्याचं सांगितलं. आमची एकता पुढील काळात आणखी भक्कम होईल, असं त्या म्हणाल्या. अखिलेश यादव यांनी आज बंगालमध्ये येण्यासंदर्भात विनंती केली होती. त्यांना उद्या यावं असं सांगितल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. एका पाठोपाठ एक असे सर्व जण येतील. माझं  लक्ष्य स्पष्ट आहे. एका लहान व्यक्तीप्रमाणं मी इंडिया आघाडीचा टीम मजबूत करणार आहे.  आता माझ्याकडे कोणतंही पद नाही, आता मी सर्वसामान्य आहे, त्यामुळं तुम्ही आता मला पदाचा वापर करताय असं म्हणून शकत नाही, आता मी मुक्त आहे. मी माझं सर्व आयुष्य लोकांच्या सेवेसाठी दिलं आहे. गेल्या 15 वर्षात पेन्शनमधून एक रुपया घेतला नाही, पगाराचा एक पैसा देखील घेतलेा नाही. मी आता मुक्त असून आता मला काही काम करायचं आहे, मी ते करणार आहे, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं. 

ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देणार नसल्याचं म्हटलं, मी पराभूत झालेली नाही, मी राजभवनात जाणार नाही, तो प्रश्नच येत नाही. आम्ही पराभूत झालेलो नाही, त्यांनी आम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. अधिकृतपणे निवडणूक आयोगा मार्फत ते आम्हाला पराभूत करु शकतात मात्र नैतिक दृष्ट्‍या निवडणूक  जिंकल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. 

मुख्य निवडणूक आयुक्त व्हिलन : ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगानं लोकशाही अधिकारांची लूट केल्याचा आरोप केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व्हिलन असल्याचं बॅनर्जींनी म्हटलं. ममता बॅनर्जींनी सत्यशोधन समिती स्थापन करणार असल्याचं म्हटलं, सत्यशोधन समिती 10 सदस्यांची असेल, त्यात 5 खासदारांचा समावेश असेल, असं म्हटलं. सत्यशोधन समितीचे सदस्य ज्या भागात अत्याचार झाला तिथं जाईल, असं बॅनर्जी यांनी सांगितलं. तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालयावर ताबा मिळवण्याचा काल प्रयत्न झाला. अभिषेक बॅनर्जींच्या कार्यालयावर काल दगडफेक करण्यात आली, तुम्ही अशा प्रकारे त्रास देऊ शकत नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाला. 

तुम्ही लोकांना अशा प्रकारे त्रास देत असाल तर कृपया समजून घ्या तुम्ही जेव्हा केंद्रात सत्तेत नसाल तेव्हा तुम्हाला अशाच लढाईचा सामना करावा लागेल, इतिहासाची पुनरावृत्ती होईल. पश्चिम बंगालमध्ये जे घडलं तो काळा इतिहास आहे, असं बॅनर्जी यांनी म्हटलं. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.