सानपाडा विभागाला अस्वच्छतेचा विळखा
समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचा पुढाकार
नेरूळ, ता. १० (बातमीदार) : स्वच्छ भारत अभियानात मनपाचे नाव देशस्तरावर गाजत असताना, त्यांच्याच कार्यक्षेत्रातील सानपाडा परिसरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले दिसत आहेत. त्यामुळे सानपाडा विभागाला अस्वच्छतेचा विळखा पडल्याची भावना नागरिक व्यक्त करीत असून, आता स्थानिक नागरिकच स्वतः कृती करून कचरा होऊ न देण्याच्या मानसिकतेत आहेत. एवढेच नव्हे, तर काहींनी रात्रीच्या वेळेस बाहेरून कचरा टाकण्यासाठी आलेल्या नागरिकांना विरोध करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सानपाडा रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडताच सानपाडा येथे जाताना कचऱ्याचे ढीग नजरेस पडतात. तसेच येथील पार्किंग परिसरात अस्वच्छता दिसून येते. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला उघड्यावर टाकलेला कचरा शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण करीत आहे. ही परिस्थिती फक्त त्रासदायक नाही, तर सानपाड्याच्या प्रतिमेलाही धक्का देणारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विवेकानंद संकुल परिसरातील मैदान, जिथे मुलांनी खेळायला हवे तिथे आज कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी असल्याचे नागरिक सांगत आहेत.
------------
नागरिकांनी जबाबदारी ओळखावी!
अशा परिस्थितीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जबाबदारी टाळता येणार नाही. निवडणुकीच्या वेळी स्वच्छतेची आश्वासने देणारे आज या प्रश्नांकडे डोळेझाक करीत असतील, तर ही अत्यंत खेदजनक गोष्ट असल्याचे मत नागरिक उपस्थित करीत आहेत. तसेच यात केवळ पालिकेला दोष देऊन चालणार नाही, तर नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. त्यामुळे घंटागाडी असताना, कचरा रस्त्यावर टाकणे, उघड्यावर घाण करणे, या सवयी स्वतः बदलल्या पाहिजेत. स्वच्छता ही केवळ घोषणा नाही, तर प्रत्येकाने याची सुरुवात स्वतःपासून सुरू करायची सवय लावली पाहिजे, असे येथील नागरिक सांगत आहेत.
----------
स्वच्छ, सुंदर आणि नियोजित सानपाडा हा आमचा हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. ज्यांना जबाबदारीची जाणीव आहे त्यांनी पुढे यावे, अन्यथा आता नागरिकच त्यांना कृतीतून उत्तर देतील, असे निवेदनही पालिकेला दिले आहे.
- नीलेश कचरे, सामाजिक कार्यकर्ते, नवी मुंबई