पश्चिम बंगालच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. टीएमसीच्या 58 आमदारांनी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वात गट स्थापन केला असून ते आता विरोधीपक्षनेते बनले आहे. आमदारांप्रमाणे आता खासदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. आता जवळपास 18 खासदार आमदारांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. लोकसभा खासदारांच्या या गटाचे नेतृत्व एका अत्यंत वरिष्ठ खासदाराकडे जाण्याची शक्यता आहे, जे बराच काळ पक्षात स्वतःकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
टीएमसीच्या आमदारांप्रमाणे आता खासदारही फुटण्याची शक्यता आहे. या फुटीमागे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून वरिष्ठ टीएमसी खासदारांशी करण्यात आलेले गैरवर्तन हे कारण असल्याचे मोठं कारण मानलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 4 मे रोजी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काही टीएमसी खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता आमदारांनी नवीन गट स्थापन केल्यानंतर खासदारही नवीन गट स्थापन करण्याची शक्यता आहे.
लोकसभेत टीएमसीचे किती खासदार आहेत?लोकसभेत टीएमसीचे 28 खासदार आहेत. यातील 18 खासदार दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सूत्रांचं म्हणणं आहे की टीएमसीच्या राज्यसभा गटात फुटीची शक्यता फार कमी आहे. कारण, राज्यसभेतील बहुतेक खासदार ममता बॅनर्जी यांच्याशी निष्ठावान आहेत आणि त्यांच्याविरोधात जाण्याची शक्यता कमी मानली जाते. राज्यसभेत टीएमसीचे 13 खासदार आहेत.
आमदारांच्या गटाचा पक्षावर दावाबंगालमध्ये तृणमूलचे आमदार आधीच दोन गटांत विभागलं गेलं आहे. आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील 60 आमदारांचा बंडखोर गट स्वतःलाच ‘खरा’ तृणमूल पक्ष म्हणत आहे. या गटाने ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली असून विधानसभा अध्यक्षांकडून त्याला मान्यताही मिळाल्याचा दावा केला जात आहे. या गटाने ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेला थेट आव्हान दिलं आहे.
ऋतब्रत बॅनर्जी काय म्हणाले?पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले नेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी म्हटले की, माझ्या नेतृत्वाखालील टीएमसी गटाला मिळणारा पाठिंबा आगामी वाढतच जाईल. पश्चिम बंगाल विधानसभेतील टीएमसीच्या मोठ्या संख्येने आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे आणि हा आकडा आणखी वाढेल.’ दरम्यान, आता आमदारांनंतर खासदारांनी जर ममता बॅनर्जी यांची साथ सोडली तर पक्षाला हा मोठा धक्का असणार आहे.