Maharashtra News Live Update : एकनाथ शिंदेंसोबत सहा खासदार नाहीत; ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास
Sarkarnama June 18, 2026 01:45 AM
शिवसेना सोडून गेलेल्यांची शून्य किंमत- राहुल पाटील

आॅपरेशन टायगर नाही, ही तर जनावारांची खरेदी विक्री असल्याचा हल्ला परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी खासदार संजय जाधव यांना लगावला. ते मनाने वर्षभरापासूनच तिकडे गेले होते. पण परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास एकदा नजरेखालून घाला, जे शिवसेना सोडून गेले त्यांची किंमत जिल्ह्याच्या राजकारणात शून्य झाली. यांचीही तीच गत होणार, असा इशाराच राहुल पाटील यांनी आॅपरेशन टागरवर प्रतिक्रिया देताना खासदार जाधव यांना दिला.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरु

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून शनिवार दिनांक २० जून पासून विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही यशस्विरित्या राबविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्राधान्याने मतदार केंद्र प्रतिनिधी यांची नेमणूक करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी केले.

कृष्णा पाटील आष्टीकरांसाठी काँग्रेसचा व्हिप

विधान परिषद निवणुकीत कृष्णा पाटील आष्टीकर यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला . त्यानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका , सर्व नगरपरिषदा , नगरपंचायतीतील काँग्रेस नगरसेवकांनी महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांनाच मतदान करण्याचे काँग्रेसचे व्हिप काँग्रेसने काढला.काँग्रेसच्या या व्हिप मुळे संभ्रम निर्माण झालाय. कारण खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेना पक्षात सहभागी होणार हे निश्चित असताना , त्यांच्याच मुलाला मतदान करण्याचे आदेश काँगेसने काढले.त्यामुळे चर्चेला उधाण आले.

दोन खासदारांनी सह्याच केल्या नाहीत

मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरसंबंधी अद्यापही संभ्रम असल्याचं चित्र आहे. ठाकरेंच्या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना सह्यांचं पत्र दिलं असल्याची चर्चा सुरू असताना ते पत्र किंवा सहा खासदारांचा फोटो मात्र अद्याप समोर आला नाही. त्यामुळे सहापैकी दोन खासदारांनी सह्याच केला नसल्याचा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे. तसेच या खासदारांवर सध्या कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, अशा आदेशही देण्यात आला आहे.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आजपासून शिर्डीसाठी थेट रेल्वे धावणार

पुणे आणि शिर्डी दरम्यानच्या प्रवाशांसाठी आजपासून थेट रेल्वे सेवेची सुरुवात होत आहे. पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला पुणे रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. या सेवेचा हजारो साईभक्तांना लाभ होणार आहे.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवा; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकंडं वळसे पाटलांची मागणी

खोडद(ता.जुन्नर) येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) या जागतिक स्तरावरील संशोधन प्रकल्पाचे महत्त्व अबाधित राखून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुणे-नाशिक सेमीहायस्पीड रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी शक्य असल्याने तज्ज्ञांच्या मतांचा विचार करून चाकण-खेड-आंबेगाव-जुन्नर-संगमनेर-नाशिक हा मूळ रेल्वे मार्ग कायम ठेवावा, अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

विदर्भात मान्सूनची प्रतीक्षा आणखी वाढणार; 'या' दिवशी होणार दाखल

- विदर्भात मान्सूनची प्रतीक्षा आणखी वाढणार

- विदर्भात मान्सून 25 जून ते 1 जुलै दरम्यान दाखल होण्याचा अंदाज

- मान्सूनची वाटचाल प्रगतीसाठी पोषक वातावरण नसल्याने मंदावली आहे त्याचा फटका बसण्याची भीती

- पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट, सर्वच जिल्ह्यातील पारा 40 शी पार राहणार

- मान्सूनच्या विलंबाचा फटका पिकांच्या सायकलला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र पाऊस चांगला झाल्यास शिवाय पेरणी करू नका असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले...

Priyanka Chaturvedi : खासदारांनी राजीनामा द्यावा

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटले आहे. त्यावर बोलताना पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, शिवसेना फुटीची लढाई अजूनही सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आता आणखी एक प्रयत्न केला जात आहे. जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना खासदार बनवले. जर कोणाचा विश्वास उडाला असेल, तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असे चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.

Defence sector : भारताने संरक्षण उत्पादन क्षेत्रात रचला इतिहास

भारताने संरक्षण उत्पादन क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. मागील आर्थिक वर्षात (२०२५-२६) देशाचे वार्षिक संरक्षण उत्पादन १.७८ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. आतापर्यंतचे हे सर्वाधिक उत्पादन मानले जात आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत यामध्ये १५.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Arvind sawant news : गटाला मान्यता दिली जाऊ शकत नाही

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवसेना यूबीटीचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी पत्र दिले. कोणत्याही स्वतंत्र गटाला मान्यता दिली जाऊ शकते. केवळ पक्ष विलीन होऊ शकतो, गट विलीन होऊ शकत नाही, असे पत्रात म्हटल्याचे सावंत यांनी सांगितले.

Shiv Sena UBT news : अरविंद सावंत, अनिल देसाई संसदेत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई संसद भवनात दाखल झाले आहेत. ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्षाचे सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

उद्धवजींनी भावासारखं प्रेम दिलं, त्यांच्यासोबत यांनी गद्दारी केली

तुम्ही आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीने निवडून आले असताना कोणालाही बेईमानी करण्याचा अधिकार नाही. मागे जे झाले त्याची पुनरावृत्ती होणार असेल तर महाराष्ट्राची जनता आणि शिवसैनिक गप्प बसणार नाही, जो राडा व्हायचा तो होईल. खासदार पक्ष सोडून गेले तर आता आम्ही शांत बसणार नाही, असं खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

रात्री १ वाजता खाजगी विमानाने ओम राजेनिंबाळकर पुण्यातून दिल्लीकडे रवाना

खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील एका खाजगी विमानाने दिल्लीला गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मंगळवारी रात्री १ वाजता पुण्यातून एका खासगी विमानाने ते दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

सावधानी पाळण्यासाठी आम्ही व्हिप जारी केला - अरविंद सावंत

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, तसंच अरविंद सांवत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेतील फुटीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अनेक खासदारांनी देवांच्या शपथा घेतल्या आणि आता ते बाहेर अज्ञातस्थळी गेल्याचं बोलंलं जात आहे. शिवाय पैसे घेऊन ते बाहेर गेल्याचंही राऊतांनी यावेळी सांगितलं.

पुण्यात भूमाफियांवर जिल्हाधिकाऱ्यांचा बुलडोझर!

पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सरकारी जमिनींच्या गैरवापराविरोधात जिल्हा प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. वेगवेगळ्या ३४ प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्याने तब्बल १९४ कोटी रुपये मूल्याच्या सरकारी जमिनी शासनाने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. या धडक कारवाईमुळे भूमाफिया आणि सरकारी जमिनी लाटणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ऑपरेशन टायगरच्या नावाखाली दोन खासदारांना उचलून नेलं - संजय राऊत

खासदार संजय राऊतांनी एक पोस्ट शेअर करत दोन खासदारांना विमानातून उचलून नेल्याचा दावा केला आहे. राऊतांनी एका विमानाचा फोटो शेअर करत आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'नांदेड विमानतळावर एक चार्टड विमान उतरते. ऑपरेशन टायगरच्या नावाखाली दोन खासदारांना उचलून निघून जाते. यांची रिक्षात फिरण्याची औकात नव्हती, खासगी विमानाने फिरण्या एवढी किंमत ठाकरेनामा मुळे वाढली. प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल. डरपोक कोल्ह्यांच्या पळवा पळविला टायगर का म्हणता?'

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे 6 खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे सुद्धा दिल्ली दरबारी दाखल होत आहेत. 17 जून हा दिवस राज्याच्या राजकारणाला कोणती दिशा देणार याकडे सर्वांचच लक्ष.

पीएमपीएमएल बस- टेम्पो धडक, व्हिडिओ व्हायरल

शिक्रापुर परिसरात पीएमपीएमएल बस आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघाताने एकच खळबळ उडाली. बसच्या जोरदार धडकेनंतर टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. अपघाताचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ऑपरेशन टायगर ची चर्चा पुण्यात रंगली चर्चा

ऑपरेशन टायगर ची चर्चा पुण्यात रंगली आहे. शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी बॅनर लावले आहे. जस्ट वेट अँड वॉच असा बॅनर वर उल्लेख केला आहे.

मस्साजोगाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे.  महाराष्ट्राच्या राजकारणात काल रात्रीपासून सुरू झालेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेने दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदार बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा दिवसभर रंगत राहिली. रात्री उशीरा ठाकरेंचे सहा खासदार अचानक नॉट रिचेबल झाल्याने ऑपरेशन टायगरवर जवळपास शिक्कामोर्तब झाले.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.