जून महिना संपत आला तरी देखील अजूनही महाराष्ट्रात पाऊस पडलेला नाहीये. राज्यात 15 दिवसांपूर्वीच मान्सून दाखल झाला. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता, मात्र त्यानंतर अचानक मान्सूनच्या वाटचालीला ब्रेक लागला. राज्यातील काही जिल्ह्यांमध्येच पाऊस झाला, तर अजूनही महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे कोरडेच आहेत. पाऊसच झालेला नाही. शेतकऱ्यांचे डोळे पावसाच्या वाटेकडे लागले आहेत, मात्र आता सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे भारतीय हवामान विभागानं (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 20 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. 20 तारखेपासून राज्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा देखील नवा अंदाज समोर आला आहे.
काय आहे नवा अंदाज
पंजाबराव डख यांनी देखील असाच अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव डख यांच्या नव्या अंदाजानुसार येत्या 21 जूनपासून ते 30 जून पर्यंत राज्यात चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सर्वत्र एकाचवेळी होणार नाही, मात्र तो वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागामध्ये हजेरी लावेल असं डख यांनी म्हटलं आहे. पावसाला साधारणपणे विदर्भातून सुरू होईल आणि त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असं संपूर्ण राज्य मान्सून व्यापून टाकेल. 21 जून ते 30 जून हे आठ दिवस राज्यात जोरदार पाऊस होईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही, असं डख यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांना काय सल्ला?
दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, आधी शेतातील ओल तपासावी, जर ओल चांगली नसेल तर पेरणी करू नये, असं पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे. जर जमिनीत एक किंवा दोन बोट एवढीच ओल असेल तर पेरणी करू नये, मात्र एक इतिच्या पुढे ओल असेल तर पेरणी करायला हरकत नाही, असा सल्ला त्यांनी दिला आहे. पुढील आठ दिवस राज्यात चांगला पाऊस होईल, तसेच यावर्षी दुष्काळ देखील पडणार नाही, राज्यात परतीचा पाऊस जोरदार होईल, असंही यावेळी पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे.