गेल्या अनेक दिवसांपासून अख्खा महाराष्ट्र आणि मुंबईदेखील ज्याची वाट पहात होती, त्या पावसाचे अखेर आगमन झाले आहे. कालपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर आज, बुधवारी सकाळीही कायम असून मुंबईसह उपनरगारत पाऊस तत कोसळत आहे, पावसाने जराही विश्रांती घेतलेली नाही. काल संध्याकाळपासून कांदिवली, मालाडसह अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असून अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच दादर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण येथेही पावसाने हजेरी लावली आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांच्या लाईफलाईनवर मात्र थोडाफार परिणाम झाला असून आधीच उशिरा धावणारी मध्य रेल्वे आता आणखी विलंबाने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतोय.
मध्य रेल्वेसह ट्रान्स हार्बरचाही खोळंबा
पावसामुळे मध्य रेल्वेची गती मंदावली आहे. एकीकडे मध्य रेल्वे विस्कळीत झालेली असल्याने रोज उशिरा येणाऱ्या लोकलमुळे प्रवासी देखील संतापले आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने, ध्य रेल्वेवरील लोकल या 10 ते 12 मिनिटे उशिराने धावत आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे अशा अनेक स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. ऑफीसला पोहोचायला होणारा उशीर, त्यातच गाड्या विलंबाने असल्याने प्रचंड गर्दी, यातून प्रवास कसा करायचा असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. पहिल्याच पावसाने लोकलची ही अवस्था झाल्याने, पुढचा अख्खा पावसाळा कसा जाणार हाही प्रश्न नागरिकांना सतावतोय.
तर दुसरीकडे ठाणे ते वाशी दरम्यान ट्रान्स हर्बल रेल्वेही विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली. तुर्भे आणि कोपरखैरणेच्या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाला होता. अखेर तो दुरूस्त झाल्यावर, 1 तासानंतर पहिली रेल्वे ठाणे ते पनवेल जाणारी लोकल सोडण्यात आली. लोकल पकडण्यासाठी फलाटावर प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. पावसाचा फटका ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही बसला असून त्यांच्या मनस्तापात वाढ झाली. तसेच तांत्रिक कारणांमुळे पश्चिम रेल्वे सेवाही काही काळ खोळंबली होती.
उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचले
दरम्यान मुंबई उपनगरात बुधवारी सकाळी पावसाचा जोर कायम आहे. काल संध्याकाळपासून कांदिवली, मालाडसह अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली . कांदिवलीमधील गणेश नगर तसेच मालाड पूर्व येथील कुरार गावातील कोंकणी पाडा या भागात पावसाचे पाणी साचले. याशिवाय इतरही अनेक सखल भागही जलमय झाल्याने कठीण परिस्थिती निर्माण झाली. काल संध्याकाळपासून पडलेल्या पावसाने जराही विश्तांरी घेतली नाही.. सतत पावसाच्या सरी कोसळतच आहेत. त्यामुळे पाण्याची पातळी आणखी वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. सध्या उपनगरात पाऊस सुरूच आहे. दरम्.यान हवामान खात्याने पुढील काही तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे,