Mumbai Rains | मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण, पुढील 3 तास ऑरेंज अलर्टचा इशारा
Tv9 Marathi June 24, 2026 01:45 PM

राज्यात मॉन्सूनने जोरदार हजेरी लावताच अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबलेली स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

मुंबईतील दादर परिसरात झाड कोसळून एका वाहनाचे नुकसान झाले, तर कुर्ला, सायन सर्कल, माटुंगा, अंधेरी आणि इतर सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. अंधेरी सबवेही पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. दरम्यान, धरण क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या संकटातून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

मुसळधार पावसाचा फटका आता थेट नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचला आहे. कांदिवली पूर्व येथील हनुमान नगरमधील राधाकृष्ण सोसायटीत अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय झाली. रात्री उशिरापर्यंत नागरिकांना घरात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने पुढील तीन तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईपुरतेच नव्हे तर राज्यातील इतर भागांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. पुण्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले. नागरिकांना रात्रभर जागून घरातील पाणी बाहेर काढावे लागले. तसेच खामगाव, शेगाव, संग्रामपूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून खरीप हंगामातील पेरण्यांसाठी हा पाऊस कितपत उपयुक्त ठरेल, याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मॉन्सूनच्या आगमनाने राज्याला दिलासा मिळाला असला तरी अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.