अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सांयकाळी मोठी दुर्घटना टळली. एअर इंडिया आणि इंडिगोचे प्रवासी विमान अचानक आमनेसामने आले. या घटनेने विमानतळावर एकच खळबळ उडाली. दोन्ही विमानांच्या वैमानिकांनी प्रसंगावधान राखत विमान काही अंतरावर थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत नागरी हवाई वाहतूक महासंचालनायाने तातडीने चौकशी सुरू केली आहे.
नेमकं काय घडलं?
नागरी हवाई वाहतूक महासंचालनायाने दिलेल्या माहितीनुसार, टॅक्सीवेवरील चुकीच्या निर्देशामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईहून अहमदाबादला जाणारे एअर इंडियाचं विमान हे धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरल्यानंतर पार्किंगच्या दिशेने जात होते. त्याचवेळी हवाई वाहतूक यंत्रणेने विमानाला टॅक्सीवे ‘सी’ वरून टॅक्सीवे ‘जी’वर जाण्याचे निर्देश दिले. परंतु एअर इंडियाच्या वैमानिकाने उजवीकडे वळण्याऐवजी विमान सरळ टॅक्सीवे ‘पी’ मार्गावर नेलं. यामुळे संपूर्ण घटना घडली.
एअर इंडियाचं विमान चुकून टॅक्सीवे ‘पी’ या मार्गावर गेलं. त्याचवेळी इंडिगोचं विमान हे अहमदाबादहून मुंबईच्या दिशेने उड्डाण करण्यासाठी टॅक्सीवे ‘पी’वरून धावपट्टीवर येत होते. त्यावेळी तातडीने एअर इंडिया विमानाच्या वैमानिकाला चूक लक्षात आली. त्याने तातडीने विमान जागेवरच थांबवलं. यामुळे दोन्ही विमान एकमेकांसमोर येऊन थांबली. त्यानंतर एअर इंडियाचं विमान ‘टो’ करत पार्किंगमध्ये आणलं. यामुळे इंडिगोच्या विमानाला मुंबईच्या दिशेने उड्डाण करण्यास उशीर झाला.
तत्पूर्वी, या घटनेत कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. मात्र, त्यानंतरही नागरी हवाई वाहतूक महासंचालनायाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. एअर इंडियाचं विमान नियोजित मार्गावरून न जाता चुकीच्या दिेशेने का गेले, यात नेमकी कुणाची चूक होती, याची माहिती चौकशीतून समोर येईल.
अहमदाबाद विमानतळावरील टॅक्सीवेवर दोन विमानांची धडक होता हाता वाचली, ते दोन्ही विमान एअरबस ए320 कॅटेगरीच्या ‘नॅरो बॉडी’ विमान होते. या प्रकारच्या विमानात जवळपास १५० ते १८० प्रवासी बसू शकतात. या घटनेवेळी दोन्ही विमानात एकूण किती प्रवासी होते, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.