भारतात राजकारणा व्यतिरिक्त सध्या एका गोष्टीची जोरदार चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे, भारतीय असल्याच्या पुराव्याची. बुधवारी, 24 जून रोजी ‘पासपोर्ट सेवा दिना’निमित्त परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी पासपोर्ट हा नागरिकत्वाचा अंतिम किंवा निर्णायक पुरावा मानला जाणार नाही. भारतीय पासपोर्ट हा प्रामुख्याने केवळ एक ‘प्रवास दस्तऐवज’ आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर भारतीय असल्याचा पुरावा नेमका कोणता? असा प्रश्न निर्माण झाला असून याचे उत्तर आम्ही आपल्याला देणार आहोत.
तुमच्या हातातील आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट हे आता तुमचे भारतीय असण्याचा पुरावा नाही, हे कळले तर निश्चितच तुम्ही चिंतेत याल.
भारतीय पासपोर्ट हे प्रामुख्याने एक ‘प्रवास दस्तऐवज’ आहे, त्याला देशांतर्गत नागरिकत्वाचा अंतिम किंवा ठोस पुरावा मानले जाऊ शकत नाही, असे आता खुद्द परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
पराराष्ट्र मंत्रालयाच्या विधानानंतर मग तुम्ही भारतीय आहात हे कसे सिद्ध होणार? या एका प्रश्नाने मोठा वाद निर्माण झाला आहे.
मात्र, कायदेशीर तज्ज्ञांच्या मते जन्म दाखला, डोमिसाईल प्रमाणपत्र किंवा Citizenship Certificate हेच आता भारतीय असण्याचे पुरावे असणार आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, हा वाद वाढल्यानंतर सरकारने स्पष्ट केले की हा कोणताही नवीन नियम नाही, तर तो जुनाच कायदा आहे.
पासपोर्ट कायदा 1967 (कलम 20) नुसार, भारत सरकार ‘सार्वजनिक हितासाठी’ किंवा विशेष परिस्थितीत परदेशी नागरिकाला किंवा निर्वासितालाही भारतातून प्रवास करण्यासाठी पासपोर्ट किंवा ट्रॅव्हल डॉक्युमेंट जारी करू शकते. त्यामुळे केवळ पासपोर्ट असणे म्हणजे व्यक्ती भारताचा नागरिक आहे असे होत नाही.
नागरिकत्त्वाच्या पुराव्यासंबंधी न्यायालयाचे काय म्हणणे आहे, तेही समजून घेतले पाहिजे. केंद्र सरकारने 2013 मधील मुंबई हायकोर्टाच्या निकालाचा हवाला दिला, ज्यामध्ये कोर्टाने स्पष्ट केले होते की पासपोर्ट हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा असू शकत नाही.




