हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. अनेकांसोबत असं होतं की एखादं महत्त्वाचं काम असतं, जे लवकर पूर्ण व्हावं असं आपल्याला वाटत असतं. मात्र अनेकदा हे काम पूर्ण होण्यास विलंब होतो. अनेकदा तर आपल्याला असं वाटत की आता हे काम होत आलं आहे, परंतु नेमकं तेव्हाच अचानक काहीतरी अडचण येते आणि ते काम पुन्हा लांबणीवर पडतं. अशा महत्त्वाच्या कामांमध्ये वांरवार अडथळे निर्माण होतात. हे असं का होत असेल? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर हे कदाचित तुमच्या घरात निर्माण झालेल्या वास्तुदोषाचा देखील परिणाम असू शकतो. जेव्हा घरात नकरात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो आणि सकारात्मक ऊर्जा कमी होते, तेव्हा त्याचा अशुभ परिणाम पहायला मिळतो. अनेकदा तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. काहीही कारण नसताना अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं, यालाच सोप्या भाषेत वास्तुदोष असं म्हटलं आहे. वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
हिंदू धर्मशास्त्रानुसार आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या नं कोणत्या देवी देवतेला समर्पित असतो. जसं की रविवार हा सूर्य देवतेला समर्पित असतो, सोमवार महादेवांना समर्पित असतो. तसचं मंगळवार आणि शुक्रवार हे दोन दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतात. जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर या दिवशी करायचा एक सोपा उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आला आहे. दर मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करा आणि एका पणतीमध्ये तांदूळ घ्या, या तांदळावर देवासमोर दिवा लावा, किंवा तुम्ही या तांदळात कापूर देखील लावू शकतात. जोपर्यंत तो दिवा तेवत आहे किंवा कापूर प्रज्वलित आहे, तोपर्यंत तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा जप करा. तुमच्या घरातील सर्व संकट कुलदेवतेच्या कृपेनी दूर होतील, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
तसेच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे तर तुम्ही जररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर आणि देवपूजेनंतर एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये धुप घेऊ तो संपूर्ण घरात फिरवा, यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असंही वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)