इनर इंजिनिअरिंग : प्रेमाचे रसायनशास्त्र
esakal July 28, 2026 11:45 AM

सद्‍गुरू, ईशा फाउंडेशन

सद्‍गुरू : तुम्ही ज्या ज्या भावनेतून जाता, त्या प्रत्येक भावनेमागे एक विशिष्ट रासायनिक प्रक्रिया असते. तुम्ही आनंदी व्हा किंवा दुःखी व्हा, तणावाखाली असा किंवा शांत असा, तुमची रासायनिक प्रक्रिया वेगवेगळ्या प्रकारे घडत असते. हे दोन्ही बाजूंनी काम करते - एखादी भावना तुमची रासायनिक प्रक्रिया बदलू शकते, आणि तुमची रासायनिक प्रक्रिया बदलल्याने तुमची भावना बदलू शकते. आपण ज्या वेगवेगळ्या अनुभवांच्या अवस्थांमधून जातो, त्यानुसार आपली रासायनिक प्रक्रिया स्वाभाविकपणे काही बदलांमधून जाते; किंवा आपली रासायनिक प्रक्रिया बदलांमधून जात असल्यामुळे, आपण अनुभवाच्या वेगवेगळ्या टप्प्यातून जातो. उदाहरणार्थ, तुम्ही उत्तेजित झालात, तर तुमचे रक्त वेगाने वाहू लागेल आणि तुमचे हृदय वेगाने धडधडू लागेल, ही एक गोष्ट झाली; पण आता जर तुमचे हृदय विनाकारण वेगाने धडधडू लागले, तर तुम्ही विनाकारण उत्तेजित व्हाल. दोन्ही गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत.

आता रासायनिकदृष्ट्या, आपण प्रेम निर्माण करू शकतो का? समजा मी माझी रासायनिक प्रक्रिया बदलली, तर मी स्वतः प्रेमस्वरूप बनू शकेन का? होय, साधना किंवा आध्यात्मिक पद्धतींच्या माध्यमातून योगामध्ये आपण हेच करतो. भक्ती योग आणि योगाचे इतर जे काही प्रकार आहेत - विशेषतः हठयोग आणि क्रिया योग - यांच्यातील फरक एवढाच आहे. क्रिया योग आणि हठयोगामध्ये, तुम्ही तुमची रासायनिक प्रक्रिया बदलण्यासाठी तुमच्या आंतरिक ऊर्जांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करता, जेणेकरून तुमची आंतरिक गुणवत्ता किंवा तुमचा अनुभव बदलेल. भक्ती योगामध्ये, तुम्ही प्रेमळ बनून ती गुणवत्ता बदलण्याचा प्रयत्न करता, जेणेकरून एखाद्या दिवशी तुमची रासायनिक प्रक्रियाच प्रेमस्वरूप बनून जाईल.

योग्य रासायनिक प्रक्रियेविना, काहीतरी बनण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, तो तुम्हाला कुठेही घेऊन जाणार नाही. तुम्ही कितीही म्हणालात की, ‘मला शांत व्हायचे आहे, मला शांत व्हायचे आहे’; पण तुमच्यात अस्वस्थतेची रासायनिक प्रक्रिया सुरू असेल, तर तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुम्ही शांत होऊ शकणार नाही. ते अशक्य आहे. प्राणायाम, आसने आणि ध्यानाच्या माध्यमातून आपण ही रासायनिक प्रक्रिया बदलत असतो. आपण शांत होण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. हे समजून घेतले पाहिजे, की ध्यानाद्वारे आपण शांत होण्याचा प्रयत्न करत नाही. आपण रासायनिक प्रक्रियाच अशा प्रकारच्या रासायनिक प्रक्रियेत बदलत आहोत, जिथे शांतता ही तुमची अस्तित्वात असण्याची सहज पद्धत बनेल. याचा अर्थ असा, की योग्य सरावाने तुम्ही तुमची रासायनिक प्रक्रिया शांततेमध्ये बदलली - अशी रासायनिक प्रक्रिया जी माणसाला आनंदी बनवेल - तर तुमची नैसर्गिक अवस्था तशीच होऊन जाईल. हे करण्याचा दुसरा मार्ग असा आहे, की प्रेमाचे एखादे माध्यम निर्माण करून, कदाचित देव, गुरू किंवा इतर कोणतीही गोष्ट, ज्याबद्दल तुमच्या मनात तीव्र भावना आहेत; जर तुम्ही त्याबद्दल प्रचंड प्रेम निर्माण केले, तर त्याने देखील तुमची रासायनिक प्रक्रिया बदलेल. दोन्ही मार्ग तितकेच खरे आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.