नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अरविंद सावंत यांनी सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 यावर लोकसभेत आपले मत मांडले. हे विधेयक का आणलं गेलं, हे सांगतो. याच कारण एक ठिणगी पडली. ती ठिणगी पडली कारण सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी युवकांना कॉकरोच म्हणलं, त्यामुळं त्या ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झाल्याचं जंतर मंतरवर पाहायला मिळालं, असं अरविंद सावंत म्हणाले.
अभिजीत दिपके, सौरभ दास, नेहा बोरा या सर्वांना सलाम करतो, असं अरविंद सावंत म्हणाले. दिल्लीत झालेलं आंदोलन राजकीय पक्षांनी केलं नाही युवकांनी केलं. गेल्या दहा पंधरा वर्षात असं आंदोलन पाहिलं नाही. इतके अत्याचार झाल्यानंतर कॉकरोच हटला नाही कॉकरोच तिथेच होता. बोस्टनमध्ये शिकणाऱ्या अभिजीत दिपकेनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन युवकांना आवाहन केलं. संविधान घेऊन, तिरंगा घेऊन विद्यार्थी उभे राहिले. ज्येष्ठ नागरिक आले, मुलांचे आई वडील आले. उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम सीजेपीला पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंनी युवकांना कॉकरोच म्हणनं चुकीचं असल्याचं सांगितलं. राज ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरेंनी मुंबईतील आंदोलनात सहभाग घेतला, असं अरविंद सावंत म्हणाले.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, देशात नव्हे तर जगभरात या मुद्यावर निदर्शनं झाली. यूके, नेदरलँड, अमेरिका,आयर्लंडमध्ये निदर्शनं झाली, असं अरविंद सावंत म्हणाले. आपला पाया भक्कम नसल्यानं पेपरफुटी झाली, आपल्या शिक्षण व्यवस्थेत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्राथमिक शिक्षणात शोषण आहे. सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड आहे, समानता नाहीये. शिक्षक नाहीयेत,काही शाळांमध्ये केवळ एक शिक्षक आहेत. 1 लाख 4 हजार 125 शाळा एक शिक्षकी आहेत, अशी आकडेवारी अरविंद सावंत यांनी लोकसभेत मांडली. प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही तर भविष्यात मुलं कशी मोठी होतील, असा सवाल सावंत यांनी केला.
सर्व मोठ्या लोकांची मुलं कुठं शिकत आहेत, यांना गरिबांची, वंचितांची वेदना काय समजणार आहे. सर्वांची मुलं विदेशात शिकत आहेत, एकेकाचं नाव घेऊन सांगू शकतो त्यांची मुलं कुठं शिकत आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले. जंतर मंतरवर जखमी झालेली युवा पिढी पाहिली. तिथं जे काही झालं, आम्ही तीन वेळा गेलो होतो. मुलींबरोबर जो व्यवहार केला ती हिंदू संस्कृतीसाठी लज्जास्पद गोष्ट होती. लांबा नावाचा अधिकारी मुलींच्या कानाखली मारत होता, असं अरविंद सावंत म्हणाले. पेपर फुटीबाबत यापूर्वी केलेल्या कायद्यात त्रुटी होत्या हे तुम्ही मान्य केलंय, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं.