Maharashtra Elections: राज्यात 15 दिवसांत आचारसंहिता लागेल, अजित पवारांकडून विधानसभा निवडणुकांचे स्पष्ट संकेत
Maharashtra Election Signals from Ajit Pawar: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्यांता लागू होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु निवडणुक आयोगाने या निवडणुका जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर निवडणुका होऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या 15 दिवसांत आंचारसंहिता लागेल असे स्पष्ट संकेत दिले आहेत. सोलापूरमध्ये बोलताना अजित पवार यांनी दोन आठवड्यात विधानसभा निवडणुका जाहीर होतील असे संकेत दिले आहेत.
"15 दिवसांत आचारसंहिता जाहीर होईल "
सोलापुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. येत्या 15 दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल आणि त्यानंतर काही दिवसांत निवडणुका होतील. त्यामुळे तयारीला लागा आणि सोलापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणा असे आदेश अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजे, असे देखील यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवारांनी निवडणुकीचे संकेत दिल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीची 'जन सन्मान यात्रा' सोलापूरमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेसची 'जन सन्मान यात्रा' सोलापूरमधील मोहोळ शहरात दाखल झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी उपस्थिती कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे स्थानिक नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी 15 दिवसांत आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर निवडणूक होईल असे वक्तव्य केले. पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातून महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजे. तुमचं झाल्यानंतर माढ्याला जाऊन तिथेही हेच सांगणार आहे असेही अजित पवार म्हणाले.