जेवढा खर्च होतो त्यापेक्षा कमी उत्पन्न होते
esakal September 24, 2024 10:45 PM

- rat२४p२.jpg-
P२४N१३६२४
रत्नागिरी ः आंबा बागायतदारांशी संवाद साधताना संजय यादवराव आणि त्यांचे सहकारी.

आंबा बागायतदारांचे खर्चापेक्षा उत्पन्न कमी

औषधांच्या किमंतीवर नियंत्रण नाही ; स्वराज्य भूमीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन सुरू

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः आंबा हंगामाच्या सुरवातीला जास्त भाव मिळतो आणि शेवटी हजार रुपये पेटीचे मिळतात. या अडीच लाखांमधील एक लाख रुपये गुरख्याला जातात आणि दीड लाख रुपये फवारणी औषधे-खते यावर खर्च होतात. ही परिस्थिती कोकणातील छोट्या हापूस आंबा बागायतदाराची आहे. जेवढा खर्च होतो त्यापेक्षा कमी उत्पन्न होते आणि कर्ज होते. औषधांच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण नाही.
स्वराज्य भूमीतर्फे सलग चार दिवस जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन सुरू आहे. दरदिवशी वेगवेगळे शेतकरी या आंदोलनात सहभागी होतात. आपल्या व्यथा मांडतात. काल (ता. २३) या ठिकाणी रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील २० आंबा बागायतदार शेतकरी उपोषणात सहभागी झाले होते. समृद्ध कोकण संघटनेचे संजय यादवराव यांनी त्यांच्याशी संवाद साधत आंबा बागायतदारांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यामधून नवीन विषयांना चालना मिळाली.
जगातील सर्वात प्रतिष्ठेचे फळ हापूस आंबा. अनेक सर्वसामान्य तरुण शेतकऱ्यांकडे ५०, १०० किंवा १५० हापूस आंब्याची झाडे आहेत. त्यांची सर्वात मोठी समस्या ही माकडे आहेत. ही माकडे हापूस आंब्याची पालवी खातात, मोहर खातात आणि आंबेही खातात. त्यामुळे सहा महिने हापूस आंब्याच्या पालवीपासून मोहर, छोटा आंबा ते पिकलेला आंबा इथपर्यंत सर्वात महत्वाचे माकडांपासून बागेचे रक्षण करावे लागते. त्यासाठी एका शेतकऱ्याला राखणीला गुरखा ठेवावा लागतो. या गुरख्याचा पगार सहा महिन्याचा ७५ हजार ते एक लाख रुपये होतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आंबे येणे कमी झाले त्यामुळे रक्षण करण्यासाठी पूर्वी तीन फवारण्या कराव्या लागायच्या. आता आठ ते दहा फवारण्या कराव्या लागतात. त्यासाठी भरपूर औषधे लागतात आणि त्याचा खर्च खूप होतो.
मोठ्या शेतकऱ्याला पाच हजार पेटीचा भाव मिळतो त्या वेळी छोट्या शेतकऱ्यांना ३५०० मिळतात. शेवटी शेवटी या शेतकऱ्यांना एका पेटीचे एक हजार रुपये मिळतात. १०० झाडामागे अडीच ते तीन लाख रुपयाचे उत्पन्न मिळते. कारण, सुरवातीला जास्त भाव मिळतो आणि शेवटी हजार रुपये पेटीचे मिळतात. या अडीच लाखांमधील एक लाख रुपये गुरख्याला जातात आणि दीड लाख रुपये फवारणी औषधे-खते यावर खर्च होतात.
-------
...म्हणून स्थलांतर वाढतेय

आंबा बागायतीमधील मिळमारे उत्पन्न कमी होऊ लागल्यामुळे येथील तरुण आंब्याची झाडे सोडून मुंबईला दहा-वीस हजार रुपयांची नोकरी करण्यासाठी जाऊ लागला आहे. शेतकरी कर्जबाजारी होतो, कोकणात कर्ज न फेडण्याची प्रवृत्ती नाही. त्यामुळे नाइलाजाने तो आपली जमीन किंवा बाग विकतो आणि मुंबईत रवाना होतो.
-----
कोट

गेली दहा वर्षे आंबा-काजू बोर्ड बनवले आहे; पण त्याला निधी दिला नाही. शासनाकडे त्यासाठी ॲक्शन प्लॅन नाही. त्यासाठी नियोजन करायची गरज आहे. त्याची सुरवात या आंदोलनाने केली आहे. त्याला कोकणातल्या शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे.

- संजय यादवराव, समृद्ध कोकण संघटना

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.