नारीशक्तीच्या उत्सवात नारीलाच नाकारण्यापर्यंत संभाजी भिडेंची मजल; दुर्गादेवी दौडमध्ये महिलांना नाकारले, म्हणाले बट्ट्याबोळ...
कुलदीप माने, एबीपी माझा October 03, 2024 01:43 PM

Sambhaji Bhide News: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji bhide) यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गणपती, नवरात्र सणाला आलेल्या उत्सवी स्वरूपावर  बोलताना त्यांनी वक्तव्य केले आहे. नवरात्र उत्सवानिमित्त सांगलीतील शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस आजपासून सुरुवात  झालीय. संभाजी भिडे यांनी  या दौडीत धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना सध्या साजरे केले जाणाऱ्या सण - उत्सवाच्या पद्धतीवर टीका केली आहे. नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही, नवरात्रीचे वाटोळं होऊ द्यायचे नाही, असे संभाजी भिडे यांनी ठणकावले. माताभगिनींनी स्वतंत्र दौड काढावी, मात्र या दौडीत महिलांना प्रवेश मिळणार नाही, असे संभाजी भिडे म्हणाले. तसेच 1962 ला चीनने भारतावर आक्रमण केलं आणि त्यावेळी हिंदी चिनी भाई भाई अशा घोषणा देणारा पंतप्रधान देशाला मिळाला यांच्यासारखी दुर्देवी गोष्ट नाही असे देखील भिडे म्हणालेत. 

आपल्याला त्या दौडीचा नाश करु द्यायचा नाही : संभाजी भिडे

 संभाजी भिडे  म्हणाले, नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही. काही माता भगिनींची इच्छा झाली दौडीत सहभगी होण्याची... हे स्वभाविक आहे. परंतु पाच वर्षाची मुलगी देखील दौडीत सहभागी होणार नाही. महिलांसाठी स्वतंत्र दुर्गा दौड काढायची, मात्र या दौडीत यायचे नाही. याचा बट्ट्याबोळ आणि वाटोळ आपल्याला करु द्यायचे नाही. सगळे सामाजिक कार्यक्रम आहेत. ते करमणूक, मिरवणूक आणि मिळवणूक यासाठी राबवले जात आहे. आपल्याला त्या दौडीचा नाश करु द्यायचा नाही.

मी पोलिस अधिकाऱ्यांना सूचवणार आहे की, आम्ही जनवारे आणि आमच्या पाठीवर हाकत चालले गुराखी असे पोलीस लोक आहेत. पोलीसांनी डोक्याला घातलेच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी धावलेच पाहिजे ही दुर्गा माता दौड आहे.  या जमावात धावलेच पाहिजे,  असे देखील  संभाजी भिडे  म्हणाले. 

महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात: संभाजी भिडे

संभाजी भिडे पुढे म्हणाले की, आतापर्यंत 76  राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमण केली. ते आता पाठलाग करतायत आपण  पाय लाऊन पळत आहोत. हिंदी - चिनी भाई भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदूना शत्रू कोण, वैरी, वाईट कोण चांगलं कोण हे कळत नाही. महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात..राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण क्षुद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा आपल्याला भारत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

हे ही वाचा :

संतापजनक... पुण्यात आठ वर्षांच्या मुलीवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार, 35 वर्षीय नराधमाला बेड्या

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.