इंदापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडली असून आज ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांचा मुलगा राजवर्धन पाटील आणि मुलगी अंकिता पाटील ही देखील शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहे. इंदापूर येथील मार्केट कमिटी येथील मैदानावर घेण्यात येणाऱ्या सभेमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते मशाल हातामध्ये घेणार आहेत. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ३० ते ३५ हजार कार्यकर्ते या सभेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस देवेंद्र फडणवीस इंदापूरमध्ये प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना शब्द दिला होता की विधानसभेला मी तुम्हाला उमेदवारी देतो. परंतु हर्षवर्धन पाटील यांना भाजपतून विधानसभेचे तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील हे आज शरदचंद्र पवार गटात प्रवेश करत आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी यांनी भाजपची साथ का सोडली आणि ते शरद पवार गटामध्ये का प्रवेश करणार आहेत यामागचे कारण त्यांनी सांगितले आहे.
हर्षवर्धन पाटील सभेला जाण्यापूर्वी त्यांच्या घरामध्ये त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यांनी सांगितले की, 'मी आज प्रवेश करतोय. १० वर्षे तालुक्याचा विकास का झाला नाही या सर्व प्रश्नांची उत्तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी देईल. प्रत्येकाला निवडणुकीत इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मोठी तयारी आमची झालेली आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतले आहे.'
तर, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीत आजचा प्रवेश विधानसभा प्रचाराची सुरूवात आहे असं राजवर्धन पाटील यांनी सांगितले. इंदापूरमध्ये लोकं दहशतीखाली आहेत. स्थानिक आमदारांनी इंदापूरचा बिहार केला आहे. इथे दिवसाढवळ्या गोळीबार होतो, अशी टीका राजवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर केली.
अंकिता पाटीलने सांगितले की, 'इंदापूरच्या जनतेच्या आग्रहा खातर आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय. मी जिल्हा परिषद सदस्य आहे. कुठेही इंदापूर तालुक्यात विकास काम झाली नाहीत. सर्व जबाबदारी आमदाराची आहे. दिवसाढवळ्या गोळीबार होतोय. मलिदा गँगने इंदापूर तालुक्याची वाट लावली. संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही करणार आहोत. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा केली. सर्व परिस्थिती आम्ही त्यांना सांगितली. त्यांना या गोष्टीची कल्पना आहे.'