पुणे, ता. २५ : ज्येष्ठ पत्रकार, लेखक - अभ्यासक विनय हर्डीकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘झपाट्याने होणारे भारताचे शहरीकरण’ या विषयावरील परिसंवादात ‘१००० हरित जिल्हा - शहरे’ हा माहितीपट प्रकाशित झाला.
विकेंद्रीत शहरीकरण व पीएमआरडीए (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) अशा दोन विषयांवर चर्चा झाली. यावेळी माजी नगरसेवक उज्वल केसकर, पर्यावरणतज्ज्ञ सारंग यादवाडकर, अर्थतज्ज्ञ अभय टिळक, नगर नियोजनकार राहुल नवले व मित्र मिशनचे संस्थापक अनंत अभंग यांची देखील भाषणे झाली. यावेळी रमेश जाधव, वास्तुविशारद गिरीश दोशी व शिरीष केंभावी, राजहंस प्रकाशनाच्या विनया खडपेकर, नगर नियोजनकार अनिता गोखले, ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह सुभाष देशपांडे उपस्थित होते.
यावेळी मित्र मिशन निर्मित व ‘डी - वर्ब’चे देवेंद्र भोमे यांनी दिग्दर्शित केलेली ‘१००० हरित जिल्हा - शहरे’ हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर विकेंद्रीत शहरीकरण या विषयावर चर्चा झाली. विनय हर्डीकर यांनी चर्चेचा समारोप केला. पीएमआरडीएच्या विविध प्रश्नांवर ‘सिटीझन्स पीएमआरडीए’ या नागरिकांच्या गटाद्वारे काम करणार असल्याची माहिती हर्डीकर यांनी दिली.