शिर्डी : वक्फ विधेयकावरून शिवसेनेने ( ठाकरे गट ) वेगळी भूमिका घेतली होती. हे विधेयक भाजपच्या मित्रांसाठी असल्याने आम्ही विरोध केला, असे मत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलं आहे. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल खासदार नारायण राणे प्रश्न विचारल्यावर त्यांनी तोफच डागली आहे. विकास, समृद्धी आणि लोकहित हे उद्धव ठाकरेंचं काम नाही, अशी टीका नारायण राणेंनी केली आहे. ते शिर्डीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
शिवसेना पक्ष आवळत चाललाय…
उद्धव ठाकरेंच्या पक्षाने वक्फला विधेयकाला विरोध केला, असा प्रश्न विचारल्यावर नारायण राणे म्हणाले, “राम नवमीसारख्या चांगल्यादिवशी नको, त्या माणसाचे नाव घेत आहात. विकास, समृद्धी आणि लोकहित हे उद्धव ठाकरेंचं काम नाही. शिव्या घालणे, चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम आहे. म्हणून पक्ष आवळत चाललाय. पुढच्या निवडणुकीपर्यंत हा पक्ष राहत नाही.”
हेही वाचा : “भाजप देशात विष कालवतंय, लोकांना तणावग्रस्त आयुष्य जगायला लावतंय,” उद्धव ठाकरेंचा आरोप
बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना संपली
“मी 39 वर्षे त्यांच्यासोबत काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे असताना पक्ष होता. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना संपली,” असे नारायण राणेंनी म्हटलं आहे.
देश आणि राज्यात लोक कल्याणाचा कारभार सुरू
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची दिशा दाखवली. विकसित भारत बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे. तर, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात चांगले काम सुरू आहे. विरोधकांकडे दुसरे काही काम राहिले नाही. देश आणि राज्यात लोक कल्याणाचा कारभार सुरू आहे,” असे राणे यांनी सांगितले.
…म्हणून वक्फ विधेयक आणले
“वक्फ कायदा हा कोणत्याही जाती धर्माविरोधात नाही. वक्फच्या नावाने जो दुरूपयोग चालला आहे, तो थांबवावा आणि मुस्लीम समाजात जे गरीब लोक किंवा तलाक झालेल्या महिला आहेत, त्यांचे पुर्नवसन व्हावे, त्यांना शिक्षण मिळावे, हा समाज देखील प्रगत समाजाबरोबर जावा, त्यादृष्टीने वक्फ विधेयक आणले,” अशी माहिती राणेंनी दिली.
हेही वाचा : अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयाची नासधूस, एकावर तलवारीने 16 वेळा हल्ला, पण..