मुंबई : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या दोन दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात सुरक्षित परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी उपलब्ध केली होती. त्यातून 184 पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आणखी 232 प्रवाशांसाठी शुक्रवारी (25 एप्रिल) एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम येथील घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मीरला जाण्यास सांगितले होते. गिरीश महाजन यांच्याकडून फडणवीस यांनी आज एकूण स्थितीचा आढावा घेतला. उद्यासाठी आणखी विमाने करायची असतील, तर करा, त्याचा खर्च राज्य सरकार देईल, असे त्यांनी सांगितले. तसेच गिरीश महाजन यांनी लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉलवर त्या पर्यटकांशी संवाद साधला आणि उपचार करणार्या तेथील डॉक्टरांचे आभारही मानले.
हेही वाचा – Pahalgam Attack : राऊतांनी शहांचा राजीनामा मागितला; नितेश राणे म्हणतात, शेंबड्या लोकांना तुम्ही…
काश्मीरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरिय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणार्या विनंतीवर काम केले जात आहे. काही पर्यटकांची कालिका धाम, जम्मू येथे राहण्याची व्यवस्था केली गेली. अमरावती येथील सुमारे 14 पर्यटक येथे थांबले होते. काही पर्यटक मिळेल त्या व्यवस्थेने जम्मूवरून दिल्लीकडे रवाना झाले असून, त्यांची दिल्ली येथे व्यवस्था करण्यात येत आहे.
शुक्रवारी काश्मीरातून येणार्या विशेष विमानात अकोला, अमरावती येथील पर्यटक असणार आहेत. दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात असून, गरज पडली तर 26 एप्रिललाही विशेष विमान करण्याची तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.
हेही वाचा – Sanjay Gaikwad : आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी…; संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने राजकारण तापणार
दरम्यान, काश्मीर येथे अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक श्रीनगर होऊन विशेष विमानाने आज मुंबईत पोहचले. या सर्व पर्यटकांना मुंबईतून त्यांच्या गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या शिवनेरी बस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या बसमधून पर्यटक आपापल्या गावी रवाना झाले.