हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत सलग पाचवा विजय मिळवला. मुंबईने वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात लखनौवर एकतर्फी विजय मिळवला. मुंबई घरच्या मैदानात 54 धावांनी हा सामना जिंकला. मुंबईने पहिले बॅटिंग केली.पलटणसाठी रायन रिकेल्टन याने 32 बॉलमध्ये 58 रन्स केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 28 चेंडूत 54 धावांची खेळी केली. मुंबईने या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 215 धावा केल्या. मुंबईच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी सार्थपणे पार पाडली. मुंबईने लखनौला 20 ओव्हरमध्ये 161 धावांवर ऑलआऊट केलं. मुंबईसाठी जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. बुमराहने 22 धावा खर्चून 4 विकेट्स घेतल्या.
मुंबईसाठी हा खास विजय ठरला, कारण हा सामना घरच्या मैदानात जिंकला. मुंबई यासह आयपीएल इतिहासात सर्वाधिक 150 सामने जिंकणारी पहिली टीम ठरली. मुंबईने आतापर्यंत आयपीएल इतिहासात एकूण 271 सामने खेळले आहेत. मुंबईने त्यापैकी 148 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर मुंबईने 2 वेळा सुपर ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघावर मात केली आहे.
दुसऱ्या बाजूला लखनौचा हा या मोसमातील 10 व्या सामन्यातील पाचवा पराभव ठरला. लखनौचा कर्णधार ऋषभ पंत याने पराभवानंतर संवाद साधला. पंत या दरम्यान एका प्रश्नावरुन चांगलाच खवळला. पंतला नक्की असं काय विचारलं? ज्यामुळे तो तापला? हे जाणून घेऊयात.
“प्रत्येक वेळेस एकाच खेळाडूबाबत प्रश्न उपस्थित करणं योग्य नाही, कारण हा एक सांघिक खेळ आहे”, असं पंतने म्हटलं. तसेच पंतने वेगवान गोलंदाज मयंक यादव याच्याबाबतही प्रतिक्रिया दिली. “मयंकला दुखापतीनंतर कमबॅक केल्यानंतर मैदानात पाहिल्याने चांगलं वाटत आहे. पहिल्याच सामन्यात त्याला लय सापडली. वेळेनुसार तो आणखी चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे”, असा विश्वासही पंतने व्यक्त केला.
दरम्यान लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या विजयानंतर मुंबईला मोठा फायदा झाला. मुंबईने सहाव्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावरुन थेट दुसर्या स्थानी झेप घेतली. मुंबईचे 10 सामन्यानंतर 12 गुण झाले आहेत. त्यामुळे मुंबई उर्वरित 4 पैकी 2 सामने जिंकल्यास प्लेऑफमध्ये पोहचेल. त्यामुळे मुंबई टॉप 2 मधून राहून पहिला क्वालिफायर सामना खेळेल, अशी आशा पलटणच्या चाहत्यांना आहे.