मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. ५ : उपनगरात झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नागरिक सर्वांत महागडे पाणी पित आहे. पाणीपुरवठा हा ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर असतो. मात्र, फक्त नफ्यासाठी राज्यातील या दोन शहरांना महाग पाणी दिले जात आहे. राज्यात इतर शहरांच्या तुलनेत पाण्याचे दर जास्त आकारून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बदलापूर व अंबरनाथ शहरातून दरवर्षी १० कोटी रुपयांचा नफा प्राप्त करत आहे, अशी माहिती भाजपचे ठाणे जिल्हा महामंत्री आणि माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांना पाणीपुरवठा केला जातो. या संपूर्ण पाणीपुरवठा कारभारात प्राधिकरण येथील पाणी वितरण, देखभाल दुरुस्ती, जल उदंचन, जल शुद्धीकरण प्रकल्प चालवणे अशी कामे करते. वास्तविक महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषदा आणि महानगरपालिका यांच्याकडे स्वतःचा पाणीपुरवठा विभाग आणि नियंत्रण आहे. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या पाणी योजनांसाठी; तसेच पाणीपुरवठ्यासाठी स्वनिधी आणि उत्पनातून खर्च करून नागरिकांना सवलतीच्या दरात पाणीपुरवठा करत असतात. किंबहुना अत्यावश्यक गरज असलेल्या पाणीपुरवठ्यासाठी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावरच हा कारभार चालवायचा असतो; मात्र मजीप्रा बदलापूर आणि अंबरनाथ शहरातून दरवर्षी १० कोटी रुपयांचा निधी (नफा) प्राप्त करत आहे, असा दावा संभाजी शिंदे यांनी केला आहे. या शहरांत पाणीगळती सुमारे ३० टक्के असून, भांडवली कामांसाठी प्राधिकरण कोणताही खर्च करत नाही, असा आरोपही शिंदे यांनी केला आहे. दिवसाआड पाण्याची समस्या असलेल्या या दोन्ही शहरात जीवन प्राधिकरणाच्या कामावर नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केलेली आहे.
पाणी १२ रुपये प्रति हजार लिटर
महाराष्ट्रातील इतर सर्व शहरांत पाणीपुरवठ्याचा दर एक ते पाच रुपये प्रति हजार लिटर आहे. मात्र, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये पाण्याचा हाच दर १२ रुपये प्रति हजार लिटर इतका सर्वोच्च आहे, असा दावा संभाजी शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे ग्राहकांकडे ३१ मार्चअखेर १२९ कोटी रुपयांची पाणीबिल थकबाकी ठेऊनही, दरवर्षी कमीत कमी १० कोटी रुपयांचा नफा जीवन प्राधिकरण कमवत आहे. पाणी योजना ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर चालवणे गरजेचे आहे. याबाबत सर्व भांडवली खर्च हा राज्य सरकार (नगरोत्थान योजना व अमृत योजना) याद्वारे केंद्र व राज्य सरकार करत असते.
समस्या जैसे थेच
राज्यात सर्वाधिक पाण्याचा दर हा अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात आकाराला जात असतानाही येथील पाणीटंचाईची समस्या सर्वाधिक आहे. दोन्ही शहरांत पाणी गळतीचे प्रमाणही ३० टक्के आहे. उंच भागात पाणी नेण्यास अडचणी येतात. शेवटच्या टोकापर्यंत कमी दाबाने पाणी जाते.
देखभाल दुरुस्तीकडे प्राधिकरणाचे दुर्लक्ष
पाण्याची गळती कमी करण्यासाठी भांडवली खर्च केला जात नाही. आवश्यक तांत्रिक मनुष्यबळाची व्यवस्थाही केली जात नाही. अंबरनाथ नगरपालिका, बदलापूर नगरपालिका यामधील विकासकामांना तांत्रिक मंजुरी देण्याची प्रक्रियाही मजीप्राचे अस्तित्वातील मनुष्यबळ (स्थापत्य, विद्युत अभियंते) करत आहेत. त्यातूनही मजीप्राला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. तोदेखील शहरातील पाणीपुरवठा सुरळीत, सक्षम व गळतीमुक्त करण्यासाठी भांडवली खर्च करण्यासाठी वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे स्टेमच्या धर्तीवर प्राधिकरण स्थापन करण्यात यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
जीवन प्राधिकरणावर यापूर्वीही आरोप झाले आहेत. आरोप करणाऱ्यांनी हे जाणून घ्यावे की, बदलापूर आणि अंबरनाथ या दोनच शहरात वाढीव दर आकारले जात नाहीत. जीवन प्राधिकरण महाराष्ट्र बोर्ड या संदर्भात निर्णय घेऊन दर आकारत असते. आम्ही फक्त निर्णयाची अंमलबजावणी करतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदांनी पाणी वितरण सेवा आपल्या हातात घ्यावी. आम्ही ती द्यायला तयार आहोत. दोन्ही नगर परिषदा ही सुविधा पुरविण्यास तयार असतील तर, तसा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारकडे सादर करावा. त्यावर जो निर्णय होईल त्यानुसार सहकार्य करु.
- मिलिंद देशपांडे, अभियंता
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अंबरनाथ