नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने चौफेर मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. गृह मंत्रालयानेही संभाव्य सुरक्षेसाठी सर्व राज्यांना ७ मे रोजी रंगीत तालीम घेण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची या अनुषंगाने दूरध्वनीवरून चर्चा झाली. ‘दहशतवादाविरोधातील लढाईत आम्ही भारताच्या पाठीशी आहोत’, असे सांगत पुतीन यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. जपाननेही भारताला पाठिंबा दिला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या संभाव्य लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरी संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी ( ता. ७ ) सर्वसमावेशक सज्जतेची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्याचे आदेश दिले आहेत. याअंतर्गत अनेक महत्त्वाच्या उपाययोजना आखण्यात येतील. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी आज संरक्षण सचिव राजेशकुमारसिंह यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्याबाबतची माहिती जाणून घेतली. पंतप्रधान मोदींनी कालच (ता. ४) हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांच्याकडून हवाई दलाच्या सज्जतेची माहिती घेतली होती. नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनीही शनिवारी (ता. ३) पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यानंतर आज संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह पंतप्रधानांना भेटले. लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीचा तपशील जाहीर करण्यात आला नसला तरी पाकिस्तानविरुद्धच्या संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठकांच्या मालिकेत संरक्षण सचिवांसोबतची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाबद्दल भारताने जी-२० देशाच्या राजदूतांना पुराव्यासह माहिती दिली आहे. दहशतवाद्यांना आणि दहशतवादाची पडद्याआडून सूत्रे हालविणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्याची जाहीर घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीच केली होती. त्यानंतर संभाव्य कारवाईसाठी सरकारने सैन्यदलांना योग्य वेळ आणि योग्य उद्दिष्ट ठरविण्याची मुभा दिली आहे.
आतापर्यंत काय?- सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती
- पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द
- आयात- निर्यात व्यापार थांबला
- भारतीय जहाजांना बंदरांत प्रवेश नाही
- तिन्ही सेनादल प्रमुखांच्या बैठका
- सर्वपक्षीय बैठकीत प्रतिहल्ल्याचा निर्धार
- विरोधकांचा सरकारला कारवाईसाठी पाठिंबा
सायबर हल्ल्याचा प्रयत्न
नवी दिल्ली, ता. ५ (पीटीआय) : पहलगाम हल्ल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये भारतीय लष्कराशी संबंधित संस्थांच्या संकेतस्थळांसह इतर काही संकेतस्थळांवर सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. या घटनांची दखल लष्कराने घेतली असून सायबर सुरक्षा वाढविण्यासाठीच्या आणि डिजिटल संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
लष्कराच्या ‘कल्याणकारी शिक्षण समाज’शी संबंधित संस्थांच्या संकेतस्थळांवर सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दिल्लीतील मनोहर पर्रीकर संरक्षण अभ्यास आणि विश्र्लेषण संस्थेच्या संकेतस्थळावरही सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या संस्थेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो फेटाळून लावला आहे. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील अनेक संकेतस्थळांवर, विशेषत: शैक्षणिक संस्थांच्या संकेतस्थळांना सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य केल्याचे दिसून आले आहे. यामध्ये विविध चार ठिकाणच्या आर्मी पब्लिक स्कूलचा समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या एका संस्थेचे संकेतस्थळही आज बंद पडले होते. मात्र, या हल्ल्यांबाबत सरकारकडून अधिकृतरीत्या काहीही सांगण्यात आलेले नाही.
या सायबर हल्ल्यांना प्रतिसाद म्हणून सरकारी पातळीवर सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. भविष्यात होऊ शकणारे सायबर हल्ले रोखण्यासाठी डिजिटल सुरक्षा यंत्रणा आणि सायबर सुरक्षा यंत्रणा बळकट केली जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले. याशिवाय, सायबर तज्ज्ञ आणि सायबर संस्था सायबर विश्वावर लक्ष ठेवून असून हल्ला करणाऱ्यांचे सीमेपलीकडील लोकांशी काही संबंध आहेत का, हे तपासले जाणार आहे.
पाकिस्तानचा निधी रोखा : भारतदहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आर्थिक कोंडी करण्याचे भारताने ठरविले आहे. पाकिस्तानला देण्यात येणारा निधी रोखला जावा अशी मागणी भारताने आशियायी विकास बँकेकडे (एडीबी) केली आहे. या संघर्षाचा सर्वांत मोठा आर्थिक फटका हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो असा इशारा ‘मूडीज’कडून देण्यात आला आहे.
पाककडून गोळीबारजम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी आजही जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ आठ विविध ठिकाणी गोळीबार केला. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी सैन्याने सलग ११ व्या दिवशी शस्त्रसंधीचा भंग केला. त्यांनी कुपवाडा, बारामुल्ला, पूँच, राजौरी, मेंधर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर अशा आठ सेक्टरमध्ये गोळीबार केला.
मॉक ड्रिलमध्ये काय?
हवाई हल्ल्याचा इशारा देणारे भोंगे वाजणार
नागरिक, विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण
वीज बंद करून ब्लॅक आउटसाठीची तयारी
महत्त्वाच्या सुविधा अन् कृती लपवून ठेवणे
आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाने कृती