‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या अचूक हल्ल्यांनंतर, पाकिस्तान भारताविरोधात सायबर युद्धाच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या कारवायांना कठोर प्रत्युत्तर दिले असून, त्यांनी दहशतवादी कारवायांसाठी वापरले जाणारे ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत.
यामुळे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या अपमानामुळे त्यांनी आता सायबर पातळीवर कुरापत काढण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे गुप्तचर सूत्रांचे मत आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इनपुटनुसार, पाकिस्तानकडून भारतीय नागरिक व संस्थांवर सायबर हल्ल्यांची शक्यता असून सर्वसामान्यांनी अत्यंत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुप्तचर विभागांनी दिलेल्या सतर्कतेनुसार, पाकिस्तानमधील सायबर सेल भारतीय नागरिकांना अज्ञात लिंक, फसवणुकीच्या वेबसाइट्स किंवा हॅकिंग साधनांचा वापर करून लक्ष्य करू शकतो.
या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी ईमेल, मेसेज किंवा लिंकवर क्लिक करू नये, तसेच कोणतीही संशयास्पद फाइल डाऊनलोड करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा.
तुमची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवा.
संशयास्पद लिंक्स आणि अटॅचमेंटवर क्लिक करणे टाळा.
मजबूत पासवर्ड वापरा.
अॅप डाउनलोड करताना काळजी घ्या.
सरकारने लोकांना व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. अज्ञात नंबर किंवा खात्यांवरून पाठवलेल्या दुर्भावनापूर्ण लिंक्स किंवा बनावट फाइल्सद्वारे वापरकर्त्यांना लक्ष्य केले जाण्याचा मोठा धोका आहे.