नांदेडमध्ये खदानीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू; मामाच्या गावी आलेल्या संघर्षने गमावला जीव
Marathi May 29, 2025 11:26 PM

नांदेड : राज्यातील काही भागांत आजही पावसाने दमदार हजेरी लावली असून गेल्या 4 दिवसांतील पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुठे पावसाच्या (Rain) पाण्याचे शेतीचे नुकसान झालं आहे, तर कुठे वीज पडून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच, नांदेड, (nanded) लातूरमध्येही पावसाने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळालं. नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील गारगव्हान येथे खदानीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 15 वर्षीय संघर्ष परघने आणि 13 वर्षीय निखिल वाढवे अशी मृत मुलांची नावे आहेत. नेवरी गावातील संघर्ष परघने हा लग्नासाठी मामाच्या गारगव्हाण या गावी आला होता. मात्र, मामाचं गाव त्याच्यासाठी काळ ठरलं. या घटनेनंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला, असून गावातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत दोघांच्या मृतदेह बाहेर काढण्याची शोधमोहीम हाती घेतली होती.

संघर्ष आणि त्याचा मित्र निखिल वाढवे हे दोघे शेताकडे जात असताना पावसामुळे रस्त्यात चिखल झाला होता. चालताना दोघांपैकी एकाचा पाय घसरून तो खदानीत पडला, त्याला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा मित्र देखील या दुर्घटनेत बुडाला. या घटनेने गारगव्हान गावावर शोककळा पसरली आहे. दुसरीकडे सातऱ्यात नदीच्या बंधाऱ्यात वाहून गेलेली व्यक्ती तब्बल 36 तासांनी मृतावस्थेत आढळून आली.

लातूरमध्ये ओढ्यावरी पूल गेला वाहून

लातूर जिल्ह्यात पावसाचा सलग पंधरावा दिवस आहे.. आज लातूर शहर आणि  परिसर असेल किंवा जिल्ह्यातील इतर भाग असेल इथे रिमझिम पावसाने हजेरी लावली होती.. मात्र निलंगा तालुक्यातील अनेक भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली.. यात उस्तुरी, औराद शहाजानी, कळमुगली, चिलवंतवाडी, टाकळी आणि वाकसा यासारख्या गावांचा समावेश आहे. उस्तुरी येथील ओढ्याला पुरासारखी स्थिती निर्माण झाली. ओढ्यावरील कमी उंचीचा पूल पाण्याखाली गेला.. इथे धोकादायक स्थिती निर्माण झाली.. यामुळे या रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली…

36 तासांनी सापडला मृतदेह

साताऱ्यातील माण नदीच्या बंधाऱ्यात वाहून गेलेल्या पळशी येथील नवनाथ पाटोळे यांचा मृतदेह तब्बल 36 तासानंतर गुरुवारी नदी पात्रात सापडला. मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास लग्न कार्य उरकून घरी परतत असताना पळशी-जाशी रस्त्यावरील माण नदीच्या बंधाऱ्यावरून येताना नवनाथचा पाय घसरून ते नदीच्या पाण्यात पडले आणि प्रवाहात वाहून गेले होते. या घटनेनंतर म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह नगरपालिकेच्या रेस्क्यू टीमने शोध मोहीम राबवली. परंतु नवनाथ पाटोळे यांचा दोन दिवस उलटूनही शोध लागला नव्हता. आज गुरुवारी त्याचा मृतदेह नदीपात्रात काटेरी झुडपाला अडकलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनतर घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पाटोळे कुटुंबियांनी आक्रोश केला. दरम्यान, नवनाथचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी दहिवडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

पिंपळनेर येथील नदीला पूर,15 गावांचा संपर्क तुटला

बीडच्या वडवणी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे बीड/माजलगाव अंतर्गत रस्ता बंद झाला आहे. तर पिंपळनेर इथे नदीला पूर आल्यानं पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे. काही तरुण या पाण्यात अनाठाई धाडस करताना दिसून येत आहेत. वडवणी तालुक्यातील सुरडी, पिंपळनेर, देवडी, काडीवडगाव यासह एकूण 15 गावांचा या पुरामुळे संपर्क तुटला आहे. त्यामुळे अनेक स्थानिक ग्रामस्थ आहे, त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत.

हेही वाचा

घरचे नीट राहणार नाहीत, कमरेवरील पिस्तुल दाखवत दम भरला; हगवणेंनी 11 लाखांना फसवलं, पोलिसात तक्रार

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.